MPL 2025: लकी ठरली पीबीजी कोल्हापूर टस्कर्स, वरूणराजाच्या कृपेने झाला प्लेऑफ्समध्ये प्रवेश
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 ची लीग स्टेज गुरुवारी (19 जून) समाप्त झाली. त्यानंतर सहा संघांच्या या स्पर्धेत केवळ चार संघ उरले आहेत. प्ले ऑफ्समध्ये मजल मारणारे हे संघ विजेतेपदासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. त्याचवेळी या साखळी फेरीत पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने चौथे स्थान मिळवले. त्यांचा हा प्रवास कसा झाला आहे आपण माहित करून घेऊ.
पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने पहिल्या दोन हंगामात प्ले ऑफ्समध्ये सहज जागा बनवली होती. पहिल्या हंगामात ते उपविजेते ठरलेले. तर, दुसऱ्या हंगामात त्यांना तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. त्यानंतर या हंगामात त्यांनी विजेतेपदाचे स्वप्न पाहिले. हंगामातील त्यांचा पहिला सामना गतविजेता रत्नागिरी जेट्स यांच्याविरुद्ध झाला. या पहिल्याच सामन्यात त्यांनी दमदार खेळ करताना 174 धावांचे आव्हान सहज पार केले. पहिल्या दोन हंगामातील ऑरेंज कॅप विजेता अंकित बावणे याने या सामन्यात अर्धशतक ठोकलेले.
दुसऱ्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघाविरुद्ध त्यांना फक्त 134 भावा उभ्या करता आल्या होत्या. या धावांचा बचाव त्यांच्या गोलंदाजांना करता आला नाही व त्यांना हंगामातील पहिला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात सातारा वॉरियर्सने त्यांना 7 धावांनी मात दिली. श्रीकांत मुंढे याने या सामन्यात संघर्षपूर्ण 64 धावा बनवल्या होत्या. पुणेरी बाप्पा विरुद्ध त्यांचा चौथा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. सामना थांबला तेव्हा पुणेरी बाप्पाने 16 षटकात 3 बाद 129 धावा बनवल्या होत्या. कोल्हापूर संघाचा पाचवा सामना रत्नागिरीविरुद्ध एकाही षटकाचा खेळ न होता रद्द केला गेला.
पुढील सामन्यात पुणेरी बाप्पा विरुद्ध पुढील सामन्यात सचिन धस व कर्णधार राहुल त्रिपाठी यांच्या खेळामुळे कोल्हापूरने 186 धावा उभ्या केल्या होत्या. मात्र, गोलंदाजांना या धावांचा बचाव करता आला नाही. त्यानंतर रायगड रॉयल्सविरुद्ध त्यांचा सातवा सामना खेळला गेला. कर्णधार राहुल त्रिपाठी याने पुन्हा एकदा दमदार खेळ करत अर्धशतक झळकावून आपल्या संघाला निर्णायक विजय मिळवून दिला. त्यानंतर ईगल नाशिक टायटन्स, सातारा वॉरियर्स व रायगड रॉयल्स यांच्याविरुद्धचे अखेरचे तीन साखळी सामने पावसामुळे रद्द केले गेले. या सर्व सामन्यातील प्रत्येकी एक गुण त्यांना मिळाला.
पीबीजी कोल्हापूर टस्कर्सने अखेर 10 सामन्यात 9 गुण मिळवून प्ले ऑफ्समध्ये आपली जागा निश्चित केली. प्ले ऑफ्समध्ये ते रायगड रॉयल्सविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळतील. या सामन्यात विजेते ठरल्यानंतर हे त्यांना अंतिम फेरीसाठी क्वालिफायर 2 सामना खेळावा लागेल.
Comments are closed.