पंढरपूर कॉरिडॉर रद्द करा अन्यथा वारकरी सांप्रदाय सरकार विरोधात भूमिका घेईल, महाराज मंडळींचा इशारा

प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर हा भाविकांसाठी, विकासकामांसाठी नसून पूर्णपणे व्यवसायिक दृष्टीकोनातून राबविण्याचे नियोजन शासन व प्रशासन करीत आहे. मात्र या विरोधात संपूर्ण राज्यात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आवाज उठविणार नसून प्रसंगी सत्ता बदलासाठी प्रचार देखील करणार असल्याच्या तीव्र भावना कॉरिडॉर विरोधात आयोजित सभेमध्ये विविध महाराज मंडळींनी व्यक्त केल्या. कॉरिडॉर तसेच डीपीला विरोध करण्यासाठी येथील संभाव्य बाधितांच्या वतीने स्थापित समितीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेचे आयोजन केले होते. यास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष वडगावकर महाराज होते. व्यासपीठावर शिरवळकर महाराज, संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ.महेश महाराज देहुकर, शंकर महाराज गलगलकर, रामकृष्ण महाराज वीर, कृती समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, डॉ.प्राजक्ता बेणारे, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, व्यंकटेश गलगलकर, ॲड.आशुतोष बडवे, सुमित शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

वारकऱ्यांसाठी आवश्यक विकासकामे करण्यापेक्षा ज्याची मागणी नाही, तो कॉरिडॉर का लादला जात आहे असा प्रश्न यावेळी उपस्थित केला. सरकार आमच्या भावनांशी, श्रद्धेशी खेळत असेल तर हे सरकार पाडण्यासाठी आम्हाला गावागावात प्रचार करावा लागेल असा इशारा देखील महाराज मंडळींनी दिला.

तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर यांनी, बालिश बुद्धीचे राज्यकर्ते प्रत्येक तीर्थक्षेत्राला एकाच तराजूत तोलत आहेत असा आरोप केला. आम्ही शासनाला शहरातील अनेक मोकळ्या जागा दाखविल्या आहेत. 200 एकर जागा विना वापर पडून असल्याचा दावा करून येथे कॉरिडॉर राबवावा अशी मागणी केली.

Comments are closed.