रायगडचा पायरी मार्ग दोन दिवस बंद, धोकादायक दगड हटविण्याची मोहीम
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर तिथी व तारखेनुसार होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर सुरेक्षेच्या कारणास्तव गडावर जाणारा पायरी मार्ग ३० आणि ३१ मेदरम्यान पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिले आहेत. या दोन दिवसांत धोकादायक व इतर दगड हटविण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार ६ जून तर तिथीनुसार २६ जून रोजी साजरा होणार आहे. यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त गडावर दाखल होतात. २०२३ साली शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी महादरवाजाखालील उंच कड्यावरून दगड कोसळून एकाचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर पायरी मार्गाने येणारे पर्यटकांच्या आणि शिवभक्त यांच्या जिवाला धोका होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून गडावरील धोकादायक झालेले दगड काढले जाणार आहे. ही मोहीम दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई यांच्या प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने ३० आणि ३१ मे रोजी राबविण्यात येणार आहे. गडाचा पायरी मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
रोप वे सेवा सुरू जिल्हा प्रशासनाने कार्यकारी अभियंता, मार्ग प्रकल्प विभाग, महाड आणि दुर्गवीर प्रतिष्ठान यांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना चित्त दरवाजा, नाणे दरवाजा आणि शिरकाई मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, या कालावधीत रायगड रोप वे सेवा नियमित सुरू राहणार आहे.
Comments are closed.