Rain Update in Maharashtra heavy rain alert by IMD weather update
मुंबई : राज्यात काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी (24 जून) पहाटेपासून पुणे, रायगड या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसामध्ये पुणे शहर परिसरात रिमझिम पाऊस सुरू होता. पण मंगळवारी पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळला. तर मध्यरात्री आणि पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. जोरदार वाऱ्यासह लागलेल्या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, पेण, माणगाव, रोहा तालुक्याला देखील रात्री चांगलेच झोडपले. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावरील सखल भागात पाणीच पाणी साचले. (Rain Update in Maharashtra heavy rain alert by IMD weather update)
हेही वाचा : Hindi Language Compulsory : ‘खोबरं तिकडे चांगभलं’ अशा भूमिकेत राहू नये, ठाकरेंनी मराठी कलावंतांना सुनावले
भारतीय हवामान खात्याने 24 जून 2025 साठी राज्यातील विविध भागांमध्ये मान्सूनसंबंधी महत्त्वाचा अलर्ट जारी केला. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या प्रमुख भागांमध्ये हवामानात विविध प्रकारचे बदल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 5 दिवस कोकण, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला. मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यानंतर पावसाने जोर वाढला आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. पुढील 5 दिवस कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. यानुसार कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर ओसरला आहे. अधूनमधून हलक्या सरी बरसत असून हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी (23 जून) सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत 6 मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात 6 मिमी पावसाची नोंद झाली. नंदुरबार जिल्ह्यातमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर डोंगराळ भागात पहाटेपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, पावसामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार असले तरी, कोकण आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.
Comments are closed.