महाराष्ट्रात भाषा लादण्याच्या प्रकरणाबाबत प्रचंड असंतोष आहे…; राज ठाकरेंचे शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी, इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय घेण्यात आला होता. जनमताचा रेटा बघून सरकारने हळूच पळवाट काढली आणि सांगितले की हिंदीची सक्ती नसेल पण कोणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल, यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीका करत शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले की, मुलांवर भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जो हाणून पाडला पाहिजे. यात एकतर मुलांचं नुकसान आहेच पण मराठी भाषेचं नुकसान आहे. सरकार काय वरून जे सांगतील त्याच्या मागे घरंगळत जायला तयार आहे, पण तुम्ही बळी पडू नका. तशी गरजच नाही. आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत.
मुळात मुलांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचं तसंच महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी राज्य भाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झालं, अजून भाषांची आत्ता खरतर काय गरज? पण हे चाललेलं राजकारण आपण समजून घेतले पाहिजे. उत्तरेतल्या लोकांना सुसंकृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे थेट किंवा आडवळणाने त्यांची भाषा माथी मारायची. त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना केला. तसेच याबाबत एक पत्र राज्य सरकारलाही पाठवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. हिंदी भाषेच्या किंवा एकूणच तिसऱ्या भाषा शिकवली जाणार नाही याचं लेखी पत्र हवं असं आम्ही सरकारला ठासून सांगितलं आहे. ते पत्र काढतील किंवा न काढतील, पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही महाराष्ट्र द्रोह समजू हे नक्की. महाराष्ट्रात या भाषा लादण्याच्या प्रकरणाबाबत प्रचंड असंतोष आहे हे आपण ध्यानात ठेवावे, असेही राज ठाकरे यांनी ठणकावले.
Comments are closed.