राजापूर तालुक्यातील सागरी सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज, लाखो रुपये खर्चुनही किनाऱ्याची सुरक्षेकडे दुर्लक्ष

अलीकडेच राजापूर तालुक्यातील सागवे-कातळी किनाऱ्यावर घडलेले शिसे चोरी प्रकरण आणि परप्रांतीय बोटींवरील खलाशांना झालेला दारू पुरवठा या दोन गंभीर घटनांनी सागरी सुरक्षेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी अल्पावधीतच प्रभावी कारवाई करून आरोपी आणि मुद्देमाल ताब्यात घेतला. मात्र प्रश्न असा आहे किनाऱ्यावर २४ तास गस्त घालणारे सागरी सुरक्षा रक्षक नेमके काय करत होते, असा प्रश्न उपस्थित होतो.

शासनाकडून सागरी सुरक्षा व्यवस्थेसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. तरीही प्रत्यक्ष पातळीवर सुरक्षा यंत्रणा ‘रामभरोसे’ चालत असल्याचे वास्तव स्थानिक नागरिक व मत्स्य व्यवसायिक मांडत आहेत. “सागरी सुरक्षा रक्षक केवळ नावालाच किनाऱ्यावर असतात; प्रत्यक्षात संशयास्पद हालचालींकडे त्यांचे कोणतेही लक्ष नसते, असा आरोप नागरिकांनी केला आहे.अनेकदा परराज्यातील बोटी येतात, खलाशी किनाऱ्यावर थांबतात, दारू आणि इंधनाची देवाणघेवाण खुलेआम होते; पण याची सुरक्षा रक्षकांना कल्पना असते की नाही, त्यांच्याकडून कधी नोंद घेतल्या जातात की नाही, असा स्थानिकांचा सवाल आहे. त्यामुळे हे रक्षक केवळ नावालाच सुरक्षा पुरवतात का? असा सर्रास प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सागरी सुरक्षेचा गाभा म्हणजे केवळ गस्त नव्हे, तर संशयास्पद हालचाली त्वरित ओळखून वरिष्ठांना कळवणे आणि त्याचा नियमित अहवाल सादर करणे होय. परंतु अलीकडच्या घटनांमध्ये ही जबाबदारी पूर्णतः पाळली गेली नसल्याचे दिसते. अलिकडे राजापूर तालुक्यातील तुळसुंदे जेटीवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा पकडला. त्यानंतर पोलिसांनी सागरी सुरक्षा रक्षकांकडे या बाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे ठोस उत्तर नव्हते.

या पार्श्वभूमीवर मच्छीमार नेते व सोसायटीचे उपाध्यक्ष तसेच मंडळाचे मानी अध्यक्ष परशुराम डोर्लेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की “आम्ही अनेक वेळा काही सुरक्षारक्षकांना बाहेरून येणाऱ्या बोटीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. तसेच रात्री अपरात्री गावात अनोळखी खलाशी फिरू नयेत, यासाठी ताकीद दिली आहे. काही गैरव्यवहार सुरू असल्याची शंका असल्यास त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही त्यांना बजावली आहे. मात्र अपवाद वगळता काही रक्षक आमच्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि बेफिकीरपणे वागताना दिसतात. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात येणार आहे.”

Comments are closed.