कोल्हापुरात तृतीयपंथी समुदायास रेशन दुकान परवाना, महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग

राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच तृतीयपंथी समुदायास रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना मंजूर झाला आहे. हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असून, यामुळे तृतीयपंथी समुदायासाठी एक आदर्श निर्माण झाला आहे.

मयुरी आळवेकर यांना हा परवाना पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते प्रदान केला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण उपस्थित होते.

तृतीयपंथी समुदायाला भेदभाव, गरिबी, सामाजिक बहिष्करण आणि रोजगाराच्या संधी मिळण्यातील अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर त्यांना रोजगाराचे साधन आणि मूलभूत हक्क मिळावेत, यासाठी मैत्री संघटनेने राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार, कोल्हापूर शहरात मैत्री संघटनेची निवड करून, त्यांना नवीन दुकानाचा परवाना देण्यात आला. या निर्णयामुळे तृतीयपंथी समुदायाला आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल पडले आहे.

हा उपक्रम तृतीयपंथी समुदायाच्या सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली.

Comments are closed.