Ratnagiri News – नुकसान भरपाई द्या, जीवन संपवण्याची वेळ आणू नका; आंबा बागायतदारांचा सरकारला इशारा

मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीचे निवेदन आंबा बागायतदारांनी अपर जिल्हाधिकारी यांना दिले. गेली काही वर्ष वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार कोलमडला असून बागायतदारांवर आत्महत्येची वेळ आणू नका, असा इशारा पावस परिसर आंबा उत्पादक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी दिला आहे.

सोमवारी (23 जून 2025) रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित जिल्हा रत्नागिरी, कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेते सहकारी संस्था रत्नागिरी, पावस परिसर आंबा उत्पादक संस्था, आडिवरे मंगलमूर्ती संघ व करबुडे रवळनाथ संघ तालुका जिल्हा रत्नागिरी संस्थेचे पदाधिकारी व आंबा बागायतदार उपस्थित होते. बागायतदारांच्या वतीने प्रकाश साळवी यांनी निवेदन देताना अप्पर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे पावसाने केलेल्या हानिकारक नुकसानीची सविस्तर माहिती दिली.

यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले आंबा उत्पादन 75 टक्के पेक्षा जास्त पावसामध्ये भिजून नष्ट झाले. सुरुवातीला तुरळक आंबा बाजारात गेला आणि ज्यावेळी हंगाम सुरू झाल्यानंतर आंबा तोडणी सुरू केली, त्यावेळी आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करून कंबरटे मोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जो औषध फवारणी, खते, राखण व गुरखे, गडी मजुरी, खोके यासाठी केलेला होता तो खर्च देखील उभा राहिला नाही. त्यामुळे बँकांचे कर्ज कसे फेडावे हा मोठा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज माफ करावे, अशी सरकारला विनंती या निवेदनात शेतकऱ्यांनी केलेली आहे. तसेच कीटकनाशके आणि खते शेतकऱ्यांना सवलतीत मिळावी, बाजारात येणारी कीटकनाशके वापरून सकारात्मक फरक पडत नाही, त्यासाठी सरकारने परिणामकारक कीटकनाशके उपलब्ध करावी अशा आशयाचे निवेदन सरकारला देण्यात आले. निवेदन देण्यासाठी प्रदीप सावंत अध्यक्ष, प्रकाश साळवे सचिव, टी एस गवाळी खजिनदार, दत्ता तांबे, सुनील नवले, शेखर घोसाळे, महिंद्रा आंब्रे, किरण तोडणकर, सुरेंद्र घुडे, अशोक भाटकर आदी अंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Comments are closed.