Ratnagiri News – भाजीपाला लागवडीला अतिवृष्टीचा फटका, शेतकरी आर्थिक अडचणीत; मदतीची मागणी

खरीप हंगामात दरवर्षी भाजीपाला लागवड करत भाजीपाला उत्पादनातून मिळणाऱ्या शाश्वत अर्थाजनावर आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या कुडावळे येथील शेतकऱ्यांनी केलेल्या भाजीपाला लागवडीला यावर्षी झालेल्या अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पार बिघडले आहे.

दापोली तालुक्यातील कुडावळे येथील चंद्रकांत पांढरे हे शेतकरी दरवर्षी खरीप हंगामात भाजीपाला लागवड करतात. अगदी श्रावण महिन्यात त्यांच्याकडील भाजीपाला हा दापोली बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. स्थानिक बाजारपेठेत कुडावळे येथील चंद्रकांत पांढरे यांच्याबरोबरीनेच एकनाथ मोरे, प्रताप पांढरे, लक्ष्मण तूपे, सुरेश भुवड, सुभाष सावंत, भरत पेवेकर, नितिन फावरे, किशोर मोरे आदी कुडावळेत राहणाऱ्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांची मात्र देऊन तयार केलेला भाजीपाला हा दापोली बाजारपेठेत विक्रीसाठी आणला जातो. त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची शेतकरी लागवड करतात. दरवर्षी प्रमाणे याहीवेळी शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली होती. मात्र अतिवृष्टीचा भाजीपाला लागवडीला चांगलाच फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. वार्षिक ताळेबंदाचे गणितच अतिवृष्टीने पार कोलमडून टाकले आहे. गावात तरुण पिढी रहावी, शहराकडे त्यांचे स्थलांतर होऊ नये, या प्रयत्नांना यश येत असतानाच निसर्गाने हे सगळे गणितच बिघडवून टाकले आहे.

दापोली तालुक्यातील कुडावळे येथील यादववाडी येथे माझिया वाणाची काकडी दहा गुंठ्यांत, 3 एकरमध्ये दिशा जातीच्या वाणाची भोपळा लागवड, 5 गुंठ्यात निगडी माठ, 2 एकरमध्ये गावठी चिबुड आदी प्रकारची लागवड ही 5 जून रोजी केली होती. ऑगस्ट महीन्यापासून उत्पादन मिळायला सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पावसाने त्यात व्यत्यय आणला आणि कुडावळे येथील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. केवळ भाजीपाला व्यवसाय हेच कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे, तेच अतिवृष्टीने हिरावून नेल्याने मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. सरकारने ठोस नुकसान भरपाई दिली नाही तर कुटूंब वाऱ्यावर पडेल, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता मदत करायला हवी, अशा प्रकारची मागणी कुडावळे येथे भाजीपाला लागवड करणारे शेतकरी चंद्रकांत पांढरे यांनी केली आहे.

Comments are closed.