Ratnagiri News – एसटी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, अपघातानंतर शिवसेना आक्रमक
चिपळूण तालुक्यातील खांदाड-गवळवाडी परिसरात, आंबडस गावाच्या सीमेजवळ कासई-सापिरली आणि चोरवणे या दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन प्रवासी जखमी झाल्याच्या घटनेने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवासी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण तालुका पक्षाच्या वतीने एसटी महामंडळाकडे अपघाताची सखोल चौकशी, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी करण्यात आली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहरप्रमुख सचिन कदम, उपतालुकाप्रमुख सचिन शेट्ये, आणि युवा सेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण आगार व्यवस्थापक रा. प. चिपळूणचे रणजीत राजेशिर्के यांना यासंदर्भातील सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यावेळी निवेदनातील विविध मुद्द्यांवर सचिन कदम, सचिन शेट्ये यांच्यासह उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा करून धारेवर धरले.
निवेदनात सदर अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा निष्पक्ष आणि सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आली. चालकाचा निष्काळजीपणा, अतिवेग, चुकीचे ओव्हरटेकिंग, रस्त्याची परिस्थिती किंवा वाहनातील तांत्रिक बिघाड यापैकी कोणता घटक अपघातास कारणीभूत ठरला, याची वस्तुनिष्ठ चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या अपघाताच्या संदर्भात कासई-सापिरली बसचा चालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचा आरोप काही नागरिकांकडून करण्यात आला होता. हा आरोप गंभीर असल्याने संबंधित चालकाची वैद्यकीय तपासणी आणि रक्तातील अल्कोहोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
मात्र, चर्चेदरम्यान आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांनी संबंधित चालकाचा मेडिकल रिपोर्ट प्राप्त झाला असून, त्याने मद्यपान केले नसल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे नागरिकांकडून करण्यात आलेल्या आरोपाबाबत वैद्यकीय अहवालाच्या आधारे वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे.दोन्ही एसटी बसची ब्रेक, स्टिअरिंग, टायर, लाईट्स, इंडिकेटर्स, हॉर्न, वायपर तसेच फिटनेस प्रमाणपत्र आदी बाबींची तांत्रिक तपासणी करून त्याचा अहवाल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर संबंधित चालकांनी अपघातापूर्वी किती तास ड्युटी केली होती, त्यांना पुरेशी विश्रांती मिळाली होती का आणि अतिरिक्त कामाचा ताण होता का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. प्रवाशांच्या जीविताशी संबंधित बाबतीत ‘नंतर कारवाई’ करण्यापेक्षा ‘आधी प्रतिबंध’ आवश्यक आहे, अशी भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चेदरम्यान मांडली.
या अपघातात सुरुवातीला २८ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली होती मात्र आगार व्यवस्थापनाकडून चर्चेदरम्यान एकूण २४ जण जखमी झाले होते अशी माहिती देण्यात आली. सर्व जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले.नुकसानभरपाईच्या संदर्भात प्रत्येकी ५०० रुपये आणि १ हजार रुपये अशा निकषांनुसार एकूण १४ हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे, अशी माहिती रणजीत राजेशिर्के यांनी दिली. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यापुढे कोणत्याही जखमी प्रवाशाला पुढील उपचाराची आवश्यकता भासल्यास त्याचा खर्चही महामंडळाकडून उचलण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहर आणि बाजारपेठेत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये, यासाठीही या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.चिपळूण शहरप्रमुख सचिन कदम व युवा सेना शहर अधिकारी श्री. पार्थ जागुष्टे यांनी बाजारपेठेतील जुन्या एसटी स्टँड परिसरातील अनधिकृत पार्किंगची समस्या दूर करण्याची मागणी केली. तसेच डी.बी.जे. महाविद्यालयासमोरील एसटी थांबा तातडीने कार्यान्वित करावा, अशी मागणीही त्यांनी केली. गणेशोत्सवाच्या काळात शहरात वाढणारी गर्दी आणि वाहनांची संख्या लक्षात घेता या दोन्ही बाबींकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मांडलेल्या मागण्यांकडे केवळ राजकीय निवेदन म्हणून न पाहता प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित सार्वजनिक हिताचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज आहे.यावेळी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, उपशहर प्रमुख राजन खेडेकर, राजू विखारे, विभाग प्रमुख मंगेश कोकीरकर, संतोष मिरगल, युवासेना उपशहर अधिकारी आकाश कदम व विभाग प्रमुख राहुल गुरव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवाशांचा जीव कोणत्याही प्रशासकीय सोयीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. त्यामुळे अपघातानंतरची मदत महत्त्वाची असली, तरी भविष्यात अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायमस्वरूपी आणि परिणामकारक उपाययोजना करणे हीच खरी जबाबदारी आहे. चिपळूण तालुक्यातील एसटी प्रवाशांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह प्रवासाची हमी देण्यासाठी प्रशासनाने या चर्चेत दिलेली आश्वासने प्रत्यक्षात किती प्रभावीपणे उतरवली जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.