बॉयलर नेणाऱ्या आयशरला ट्रकची धडक, वेरूळ घाटातील अपघातात सासू-जावयाचा जागीच मृत्यू

गुरुवारी दुपारी चार वाजता वेरूळ घाटामधून मोठ्या आकाराचे बॉयलर घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकला दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने आयशरवरील बॉयलर खाली कोसळले. बाजूने जाणारे मोटारसायकलवरील सासू – जावई या बॉयलरखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आयशरमधून घाटात पडलेल्या बॉयलर मार्गावरून जाणाऱ्या कारला अडकल्याने मोठी जीवित हानी टळली. या अपघातात दोन ट्रक, कार व मोटारसायकल हे एकमेकांना धडकले.
आज दुपारी चार वाजता औद्योगिक वापराकरिता असलेला ४० फूट रुंद व ६० फूट उंच असा भव्य बॉयलर घेऊन आयशर (एम एच ४२ एजी ९६४६) वेरूळ येथून रत्नपूरकडे येत होता. रस्ता दाखवण्यासाठी व अडथळे दूर करण्यासाठी सोबत काही मजूर पुढे चालत होते. याच वेळी रत्नपूरकडून ट्रक (एम एच २० जीपी १४०४) वेरूळकडे जात होता. या ट्रकला वेग कमी करण्याची सूचना या मार्गावर चालणाऱ्या मजुरांनी दिली. मात्र, ट्रकचा वेग जास्त असल्याने चालकाला कंट्रोल करता आला नाही. ट्रक बॉयलर घेऊन जाणाऱ्या आयशरला धडकला. या धडकेमुळे आयशर ट्रकवर ठेवलेले बॉयलरचे पट्टे तुटले व बॉयलर घाटामध्ये रस्त्यावर आडवे पडले. त्याचवेळी कचरू सांडू त्रिभुवन व त्यांच्या सासू चंद्रभागाबाई आसाराम भालेराव हे मोटारसायकलने (एम एच २० जीपी १४०४) वेरूळहून रत्नपूरकडे येत असताना दोघे बॉयलरखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बॉयलर घाटातून जात असताना वेरुळ कडून रत्नपूरकडे कारने (एमएच २८ व्ही ०३३०) कुटुंबीयांसह जाणारे संदीप घुगे (रा. मेहगाव, तालुका कन्नड) यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी प्रसंगावधान राखत कार बाजूला घेतली. बॉयलर कारला अडकले व थांबले. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली.
वेरूळ घाटातील रस्त्यावर बॉयलर आडवे झाल्याने वाहने जाणे शक्य नसल्याने या मार्गावरील दोन्ही बाजूकडील सर्व वाहतूक पोलिसांनी तातडीने थांबविली. बॉयलर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न केले. सायंकाळी सात वाजता त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातामध्ये ठार झालेले कचरू सांडू त्रिभुवन हे वेरूळ येथील गुरुकुल विद्यालयाच्या पाठीमागे राहत होते. ते वेल्डिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते. घरातील एकमेव कमावती व्यक्ती असल्याने त्यांच्यावरच संपूर्ण कुटुंब अवलंबून होते. त्यांच्या अपघाती निधनामुळे पत्नी, मुलगा व दोन मुलींवर मोठे संकट कोसळले. त्यांच्या सासू चंद्रभागाबाई आसाराम भालेराव या रत्नपूर येथील राजीव गांधीनगरमध्ये राहत होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.
जड वाहनांसाठी घाट बंद
वेरूळ घाटामध्ये जड वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्यात आलेली आहे. ही वाहतूक सोलापूर हायवेमार्गे वळवण्यात आलेली आहे. रत्नपूर येथील उर्स सुरू असल्याने या मार्गावरील छोटी वाहने वगळता सर्व वाहतूक पोलिसांनी वळवली आहे. मात्र, इतका मोठा बॉयलर कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना न करता बंदी असतानाही घाटातून कसा आला, महामार्ग पोलिसांनी मोठा कंटेनर येण्यासाठी परवानगी कशी दिली, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
Comments are closed.