टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन बनल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट! म्हणाला, “तुमच्याशिवाय आयुष्य….”

रिंकू सिंगने आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ जिंकल्यानंतर आपल्या वडिलांसाठी एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली. भारताने रविवारी (८ मार्च) न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात ९६ धावांनी पराभव केला. भारताच्या या विजयी संघात रिंकूही होता. त्याला विश्वविजेतेपद जिंकल्यावर नीट आनंदही व्यक्त करता आला नाही, कारण अंतिम सामन्याच्या काही दिवसांआधीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याच्या वडिलांचे २७ फेब्रुवारीला कॅन्सरमुळे निधन झाले. त्यामुळे तो स्पर्धेदरम्यान घरी गेला होता.

रिंकूने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “मी कधीच इतके दिवस तुमच्याशी न बोलता घालवले नाहीत. तुमच्याशिवाय आयुष्य कसे चालेल हे मला माहित नाही, पण मला प्रत्येक पावलावर तुमची गरज भासेल. तुम्ही मला शिकवले की कर्तव्य प्रथम येते. म्हणून मी फक्त मैदानावर तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो. आता तुमचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मला फक्त असे वाटते की तुम्ही माझ्यासोबत असता. प्रत्येक लहान-मोठ्या आनंदात मला तुमची आठवण येईल. बाबा, मला तुमची खूप आठवण येईल.”

रिंकूच्या वडिलांचे स्वप्न होते की त्याने भारताकडून खेळावे आणि विजेतेपद जिंकावे. त्याने त्यांचे स्वप्न पूर्ण केले, मात्र त्याला विश्वविजेतेपद जिंकताना पाहण्यासाठी ते या जगातच नाही.

रिंकूला २०२४च्या टी२० विश्वचषकाच्या भारतीय संघात जागा मिळाली नव्हती. तेव्हा तो ट्रॅव्हलिंग रिजर्व म्हणून संघासोबत होता. आता २०२६मध्ये त्याची थेट १५ सदस्यीय संघात निवड झाली. या स्पर्धेत त्याने ५ सामने खेळले आणि त्यामध्ये २४ धावा केल्या होत्या. आता तो आयपीएलमध्ये खेळताना चाहत्यांना दिसणार आहे. यामध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो.

Comments are closed.