Rohini Khadse criticizes government regarding road cave-in
मुंबईला खड्डेमुक्त करण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 साली केला होता. खड्डेमुक्त सोडा, पण आहेत त्या खड्ड्यांमध्ये आणखी भर पडली आहे. मुंबईची आज ही अवस्था असेल तर, मुंबईच्या सौंदर्यकरणाच्या नावाखाली महानगरपालिकेच्या ठेवींमधून जे पैसे काढले ते गेले कुठे?
(Rohini Khadse on Mahayuti) मुंबई : महानगरातील मेट्रो -3 च्या भुयारी मार्गाचे मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या पहिल्या पावसात तीन तेरा वाजले होते. आज, सोमवारीही मुंबई आणि परिसरात पाऊस सुरू असून गिरगावात भुयारी मेट्रोलगतची जमीन खचल्याने एक बेस्ट बस पाच फूट खड्ड्यात गेल्याची धक्कादायक घटना सकाळी घडली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारला धारेवर धऱले आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. (Rohini Khadse criticizes government regarding road cave-in)
मुंबईतील एक्वा लाइन-3 या भुयारी मेट्रो मार्गात 26 मे रोजी सकाळी झालेल्या पावसामुळे पाणी साचले. वरळी येथे भुयारी मेट्रो स्थानकाच्या पायऱ्यांवरूनही पाणी वाहू लागल्याने हे मेट्रो स्थानक आहे की, धबधबा असा प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी ही मेट्रो सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. तर, मुंबई मेट्रोची यंत्रणा सुरक्षित असल्याची खात्री मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली आहे.
पण अवघ्या 20 दिवसांतच पुन्हा एकदा मुंबईकरांचा प्रवास धोक्याचाच असल्याचे स्पष्ट झाले. मिळालेल्या माहितीनुसार, गिरगावातील ठाकूरद्वार सिग्नलजवळ कुलाबा ते वांद्रेसाठी जाणाऱ्या मुंबई मेट्रो 3 स्टेशनचे खोदकाम सुरू आहे. त्याच भागात रस्त्याच्या समांतर बाजूने बॅकबे डेपोची 121 क्रमांकाची बस सकाळी 10 वाजताच्या सुमारास जात होती. त्याचवेळी रस्ता खचल्याने ही बस पाच फूट खोल खड्ड्यात अडकली.
याच घटनेवरून रोहिणी खडसे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. सरकारचे कामकाज कसे सुरू आहे? तर, खड्ड्यात गेले आहे! या वाक्याची प्रचिती आपल्याला ही बेस्टची बस अवस्था पाहून नक्कीच येईल, असा टोला त्यांनी लगावला आहे.
मुंबईला खड्डेमुक्त करण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 साली केला होता. खड्डेमुक्त सोडा, पण आहेत त्या खड्ड्यांमध्ये आणखी भर पडली आहे. मुंबईची आज ही अवस्था असेल तर, मुंबईच्या सौंदर्यकरणाच्या नावाखाली महानगरपालिकेच्या ठेवींमधून जे पैसे काढले ते गेले कुठे? असा सवाल करत रोहिणी खडसे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. नियम डावलून कोट्यवधी रुपयांचे रस्त्यांचे कंत्राट ठेकेदारांना दिले. त्यातून टक्केवारीचा हिशेब झाला. यावर सुप्रीम कोर्टानेही आक्षेप घेतला आहे. यातून जनतेला काय मिळाले खड्ड्यांमधला रस्ता? अशा शब्दांत त्यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.
Comments are closed.