ती HOTLINE कर्जत-जामखेडकरासाठी का नाही? MIDC वरून रोहित पवार यांचा सवाल

एका फोनवर MIDC होणार असेल तर ती HOTLINE कर्जत-जामखेडकरासाठी का नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला विचारला. तसेच आजचे सत्ताधारी मलिदा आणि स्वार्था शिवाय काहीच करत नाहीत असेही रोहित पवार म्हणाले.

एका भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन लावला. या भागात एमआयडीसी हवी असे सांगितले. त्याचा एक व्हिडीओ रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, एका फोनवर MIDC होणार असेल तर ती HOTLINE कर्जत-जामखेडकरासाठी का नाही? कर्जत-जामखेडमध्ये MIDC व्हावी, त्यात उद्योग यावे आणि इथल्या युवांना रोजगार मिळावा म्हणून शासनाला डझनभर पत्र लिहिले, निवेदनं दिली, उपोषण केले, विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात आवाज उठवला पण उद्योगमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द देऊनही तो पाळला नाही, हा माझ्या मतदारसंघातील युवांवर अन्याय नाही का?

‘कुणाविषयीही आकस ठेवणार नाही किंवा ममत्त्वभाव बाळगणार नाही,’ अशी शपथ घेऊनही मंत्री या शपथेचा सर्रास भंग करतायेत. सरकारने नागरिकांना समान वागणूक देणं अपेक्षित असूनही आजचे सत्ताधारी मलिदा आणि स्वार्था शिवाय काहीच करत नाहीत, हेच यावरून सिद्ध होतं असे रोहित पवार म्हणाले.

Comments are closed.