हे सरकार गरीबांचं नाही, तर पैसेवाल्यांचं अन् गुन्हेगारांचं; सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने टाहो फोडल

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण: परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणावरुन आमदार रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. आहे. हे सरकार गरीबांचं मायबाप नाही तर गुन्हेगारांचं आणि पैसेवाल्यांचं मायबाप आहे, हे स्व. सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi Case) यांच्या मातोश्रींचे उद्विग्न शब्द काळीज चिरणारे आणि आजच्या सत्ताधाऱ्यांचं वस्त्रहरण करणारे आहेत. पोटच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी एक आई ८ महिन्यांपासून टाहो फोडतेय, आधी हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टानेही दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला पण सरकार मात्र अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री महोदय, कृपया खुन्यांना वाचवून न्यायाचा मुडदा पाडू नका, अशी टिप्पणी रोहित पवार यांनी केली आहे.

सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी नुकतीच ‘बीबीसी मराठी’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत विजयाबाई सूर्यवंशी यांनी राज्य सरकारवर कठोरपणे टीका केली होती. ‘पूर्वी म्हणायचे की, सरकार गरिबाचं मायबाप असतं. पण हे सरकार पैशावाल्याचं मायबाप हाय, गुन्हेगाराचं मायबाप हाय, हे माझं गरिबाचं मायबाप नाही. आज आठ महिने झाले. मला न्याय भेटेल म्हणून मी वाट बघतेय’, असे विजयाबाई सूर्यवंशी यांनी म्हटले.

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत महायुती सरकारला झटका दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू नैसर्गिकपणे झाल्याचे म्हटले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हा दावा फेटाळून लावत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप होत असताना अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा कसा दाखल होऊ शकतो, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. सोमनाथच्या आई विजयाबाईंनी यावरुन राज्य सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

सुप्रीम कोर्टापर्यंत जायची वेळ आली गरिबाला, सुप्रीम कोर्टानं बी आदेश कायमच ठेवला. त्याचं पालन सरकार करत नसेल तर कोण करणार? एका गरिबासाठी सरकाराच्या डोळ्यावरची पट्टी का निघत नाही? आज लाडकी बहीण-लाडकी बहीण तुम्ही म्हणलो. आज लाडक्या बहिणीला वेळ आल्यावर तुम्ही धावून येत नाही म्हटल्यावर कोण धावून येणार आहे आणि न्याय कोण देणार आहे आम्हाला? सोमनाथला मारहाण करण्यात आली तेव्हा 10 ते 15 डिसेंबरपर्यंत जे जे पोलीस कर्मचारी ड्यूटीवर होते, याच्यामध्ये जे कुणी असतील, ज्यांनी मारहाण केलेली आहे, त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी विजयाबाई सूर्यवंशी यांनी केली.

https://www.youtube.com/watch?v=fz7hrsf3pxi

आणखी वाचा

Comments are closed.