लग्नाला नकार देताच गळ्यावरून चाकू फिरवला; प्रियकराला दारू पाजून मित्र, भावाच्या मदतीने काढला का
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहराच्या हर्सूलमधून 31 जुलैला बेपत्ता झालेल्या छावा संघनटनेचा शहर प्रमुख सचिन पुंडलिक औताडे यांचा प्रेम प्रकरणातून गळा चिरून खून झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कॅनॉट भागात त्यांच्या प्रेयसीने तिच्या मामेभावाच्या मदतीने सचिन यांचा काटा काढला. पैठणला गोदावरी नदीत त्याचा मृतदेह फेकला. वाहत गेलेला हा मृतदेह मुंगी गावात येथे तरंगत काठावर आला. त्यानंतर या खुनाला वाचा फुटली. अहिल्यानगर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवित चार दिवसांत 2 आरोपींना बेड्या ठोकल्या. अद्याप एक आरोपी पसार आहे. दुर्गेश मदन तिवारी, भारती रवींद्र दुबे छावा संघटनेची महिला प्रदेशाध्यक्ष अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अफरोज खान हा पसार आहे.
लग्न करण्यास नकार दिल्याने काढला काटा
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी भारती दुबे ही स्थानिक छावा संघटनेची महिला पदाधिकारी आहे. सचिन औताडे त्याच संघटनेत काम करीत होते. ते दोघेही विवाहित आहेत. मात्र, भारतीने फारकत घेतली होती. सचिन आणि भारतीचे प्रेमसंबंध होते. भारतीने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. ते विवाहित असल्याने ते नकार देत होते. भारती पतीपासून वेगळी झाली असून, एकटी कॅनॉट प्लेसमध्ये राहत होती. भाऊ असल्याचा दावा करणारा दुर्गेश फार्मसीचे शिक्षण घेऊन एका औषधी कंपनीत नोकरीला आहे.तर फरार असलेला आरोपी अफरोज वाहन खरेदी-विक्री एजंट आहे. भारती व सचिन चार वर्षापासून एका संघटनेत काम करत होते. ती राज्य महिला प्रदेशाध्यक्ष असून, सचिन शहराध्यक्ष होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. 31 जुलै रोजी दोघांनी दारू खरेदी केली. कॅनॉट प्लेसच्या फ्लॅटवर मामेभाऊ दुर्गेशही सहभागी झाला. भारतीने मध्यरात्री अफरोजलादेखील बोलावून घेतले. तेव्हा त्यांच्यात वाद झाले. तिघांनी बेदम मारहाण करत सचिनवर चाकूने वार करत जिवे मारल्याची माहिती समोर आली आहे.
दोन टॅटूवरून ओळख
कुटुंब बेपत्ता असलेल्या सचिन यांचा शोध घेत असताना 13 ऑगस्ट रोजी शेवगावलगत मुंगी येथील गोदापात्रात सचिन यांचा मृतदेह आढळून आला. मानेच्या उजव्या बाजूस भक्त्ती, तर हातावर सचिन नाव गोंदलेले होते. यामुळे त्यांची ओळख पटली. शरीरावर गंभीर वार असल्यामुळे ही हत्याच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी प्रकरणाचा तपास केल्यानंतर घटना उघडकीस आली.
13 दिवसांनंतर 14 किलोमीटरवर मृतदेह वाहून आला
सचिन यांच्या मित्रांच्या चौकशीत भारतीचा उल्लेख झाला, त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. 31 जुलैपासून भारती राहत असलेल्या फ्लॅटवर परतली नसल्याचे कळताच पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही तपासले. रात्री दीडला तिघेही प्लास्टिकमध्ये मृतदेह घेऊन जाताना दिसले. पैठणच्या पुलावरून त्यांनी मृतदेह गोदावरीत फेकला. 13 दिवसांनंतर मृतदेह 14 किलोमीटरवर वाहत जाऊन मुंगी गावातील पात्रापर्यंत वाहत गेला.
80 पेक्षा जास्त फुटेज आणि एक फोन नंबर
अहिल्यानगर गुन्हे शाखेने भारतीचा शोध सुरू केला. भारतीचे सर्व मोबाइल बंद होते. 1 ऑगस्ट रोजी दोघांना साखरखेर्डात सोडून अफरोज पसार झाला. चार दिवसांपूर्वी तो चिकलठाण्याच्या वाहन बाजारात गेल्याचे समजताच पोलिस पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. मात्र, तो सापडला नाही. पथकाने 80 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याच दरम्यान भारतीने एका मित्राला कॉल केला. त्या एका क्रमांकावरून पोलिसांनी साखरखेर्ध्यात नातेवाइकाच्या शेतातून भारतीला ताब्यात घेतलं.
आणखी वाचा
Comments are closed.