आणीबाणीत वर्तमानपत्र बंद पाडणाऱ्या शंकररावांचा मुलगा आज भाजपात; संजय राऊतांचा पलटवार

मुंबई : केंद्रातील भाजप आणि राज्यातील फडणवीस सरकारने, तसेच भाजपच्यावतीने 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्यात आला. देशात 25 जून 1975 साली तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या सरकारने आणीबाणी लागू केली होती. या आणीबाणीचा विरोध करत, निषेध नोंदवत भाजपने (BJP) काँग्रेसला लक्ष्य केलं. मात्र, सध्या देशात अघोषित आणीबाणीच (Emergency) सुरू असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मुंबईतील एका कार्यक्रमातून भाजपवर हल्लाबोल केला. हुकूमशाहींच मोठं उदाहरण म्हणजे श्वेता संजीव भट आहेत, गेल्या 7 वर्षापासून स्वतःच्या पतीसाठी त्या लढत आहेत, असे म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधला. तसेच, आणीबाणीतील शंकरराव चव्हाणांचा मुलगा आज भाजपसोबत आहे, असा मिश्कील टोलाही राऊतांनी लगावला.

भाजपचे लोक सांगतायत की आणीबाणी हा काळा अध्याय आहे. पण, मला वाटतंय अनेक काळे अध्याय आहेत, मोठा काळा अध्याय म्हणजे महात्मा गांधी हत्या झाली. दुसरा काळा अध्याय कोणता तर प्रेसिडंट ट्रम्पच्या दबावाखाली देशाचा पंतप्रधान सरेंडर झाला, यापेक्षा मोठा काळा अध्याय कोणता असेल? हे काय आम्हाला आणीबाणी सांगतायत असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर आणि आणीबाणीवरुन काँग्रेस, शिवसेनेला डिवचणाऱ्यांवर पलटवार केला. देशाच्या सध्याच्या पंतप्रधानांनी कितीही प्रयत्न केले तरी इथली लोकशाही मरणार नाही, असेही ते म्हणाले.

गेली 11 वर्षे अघोषित आणीबाणी

इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली तेव्हा ती देशाची गरज होती असं मी मानतो, त्यावेळच्या परिस्थीतिनुसार आणीबाणी जाहीर केली होती. संविधानाणे दिलेले अधिकार वापरून आणीबाणी जाहीर केली, तो त्यांचा अधिकार होता. पण, गेल्या 11 वर्षात अघोषित आणीबाणी सुरू आहे त्याच काय? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.

आणीबाणीत वर्तमानपत्र बंद करणाऱ्याचा मुलगा भाजपसोबत

पहलगाम हल्ला आणि पाकिस्तानविरुद्धच्या लढाईसंदर्भाने आम्ही मागणी करतोय की विशेष अधिवेशन बोलवा पण ते बोलवत नाहीत आम्हाला विचारायच आहे की मोदीजी आपण सरेंडर का झालात? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. आणीबाणीवेळी अनेक पत्रकारांवर कारवाई झाली. काहींची वर्तमानपत्र बंद झाले, त्यात आमचं मार्मिक होत. तेव्हा वर्तमानपत्र बंद पाडणारे शंकरराव चव्हाण यांचा मुलगा आता भाजपला जवळचा झाला आहे. अशोक चव्हाण आता मोदींना प्रिय झाले आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप आणि अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.

दरम्यान, नरेंद्र मोदी आणि अमित शहा लोकशाहीचा रोज खून करत आहेत. मी आणि अनिल देशमुख सहकारी आहोत, देशासाठी तुरुंगात जाणं चुकीच नाही, आता आम्हाला पेन्शन द्यावी लागेल, असा मिश्कील टोलाही राऊतांनी लगावला.

हेही वाचा

Video: पहिली नव्हे, तिसरीपासून हिंदी भाषेची पुस्तके; दादा भुसेंनी सांगितला शिक्षण धोरणातला मुद्दा

आणखी वाचा

Comments are closed.