Sanjay Raut harshly criticizes Ajit Pawar after the Indrayani bridge accident
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार नैतिक जबाबदारी घेणार का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. या घटनेनंतर राऊतांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळा या पर्यटन स्थळावर रविवारी (ता. 15 जून) दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. कुंडमळा येथे असलेल्या पुलावर लोकांची गर्दी जास्त झाल्याने हा पूल कोसळला आणि मोठी दुर्घटना घडली. या घटनेत आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पण अद्यापही काही पर्यटक बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलेला असतानाच आता या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. पालकमंत्री म्हणून अजित पवार या घटनेची नैतिक जबाबदारी घेणार का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. (Sanjay Raut harshly criticizes Ajit Pawar after the Indrayani bridge accident)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. 16 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला पनवती असे म्हटले आहे. तसेच, कुंडमळा दुर्घटनेवरून सरकारवर आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप करताना राऊतांनी म्हटले की, काल पुण्यात दुर्दैवी आणि गंभीर घटना घडली. इंद्रायणी नदीवरील कुंडमळा भाग आहे, त्या ठिकाणी असलेला पूल कोसळला. हा जूना पूल होता, तो काल वाहून गेला. या घटनेत नक्की किती लोक मृत पावले आहेत, याचा खरा आकडा अद्याप बाहेर आलेला नाही. लोक वाहून गेले आहेत, त्या पुलावर 100 पेक्षा जास्त पर्यटक उपस्थित होते. त्यामुळे तो पूल कोसळला. यामध्ये किमान 50 लोक वाहून गेले. त्यातील काही लोक सापडले, काहींना वाचवण्यात आले आहे. पाच ते सहा मृतदेह मिळालेले आहेत. आमच्याशिवाय कोणी विकास करू शकत नाही, असे म्हणत हे सरकार विकासाच्या गोष्टी करत असतात, असे राऊतांनी म्हटले.
तसेच, माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे, असे विचारत खासदार राऊतांनी म्हटले की, गेली अनेक वर्ष अजित पवार त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. याचा त्यांना गर्व आणि अहंकार आहे. मी आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळे करू शकत नाही. मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजित पवार हे पालकमंत्री म्हणून घेणार का? की झटकून टाकणार. ते काल एका पत्रकाराला दम देत होते, कारण त्यांना सर्व माहीत असतं. मग हा पूल जूना झाला आहे आणि त्या ठिकाणी त्यांचाच आमदार आहे, सुनील शेळके. या सुनील शेळकेंना जिंकवण्यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले होते. ज्या आमदाराला ते सोबत घेऊन फिरत असतात. मग हा पूल बांधण्यासाठी यांच्याकडे एक, दोन कोटी रुपये नव्हते का? गेल्या अनेक वर्षांपासून ते हा पूल उभा करू शकले नाहीत. पालकमंत्री अशा लहान कामामध्ये झोपलेले असतात. मोठी बिल्डरांची कामे, मेट्रोची कामे, मोठ्या ठेकेदारांची कामे यामध्ये ते जागे असतात, असा टोला राऊतांनी लगावला.
Comments are closed.