Sanjay Raut has asked Devendra Fadnavis what happened to SIT of Salim Kutta case
मुंबई : शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी (ता. 17 जून) भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाआधी काही नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. कारण मंगळवारी सकाळी बडगुजर यांचा पक्ष प्रवेश होत असताना सकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबतची कोणतीच माहिती नसल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले. पण दुपारी पार पडलेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. महत्त्वाची बाब म्हणजे, बडगुजर यांचे अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुत्ता याच्यासोबत फोटो शेअर करून भाजपाच्याच नेत्यांनी रान उठवले होते. पण त्याच बडगुजर यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपाने विरोधकांना आयते कोलीत दिले आहे. (Sanjay Raut has asked Devendra Fadnavis what happened to SIT of Salim Kutta case)
सुधाकर बडगुजर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. सलीम कुत्ता प्रकरणाशी संबंधित चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात येत आहे, अशी घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. मग त्या एसआयटीचे काय झाले? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. बुधवारी (ता. 18 जून) संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुधाकर बडगुजर यांत्या भाजपा प्रवेशावर भाष्य करत राऊत म्हणाले की, या राज्याचे मुख्यमंत्री हे राजकारणातले कारस्थानी गृहस्थ आहेत. त्यांची कोणतीही चाल सरळ नसते आणि मराठी माणसासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी असतच नाही. पण मी मुख्यमंत्र्यांना दोष देणार नाही कारण तोडा, फोडा आणि राज्य करा हे भाजपाचे धोरण आहे, असे टीकास्त्र राऊतांनी डागले आहे.
हेही वाचा… Sanjay Raut letter : …तर इतर स्फोट नाइलाजाने करावे लागतील, संजय राऊतांचा फडणवीसांना इशारा
तसेच, हिंदुंची, मराठी माणसांची एकजूट तोडा हे त्यांचे धोरण आहे आणि मग त्यासाठी त्यांना सलीम कुत्ताही चालतो, इक्बाल मिर्चीही चालतो आणि उद्या दाऊद इब्राहिमही चालेल. हे त्या पक्षाचे धोरण आहे आमचे तसे धोरण नाही. आम्ही एक वैचारिक भूमिकेतून काम करणारे लोक आहोत. काल जसे शरद पवार यांनी एक भूमिका मांडली की, भाजपासोबत जाणाऱ्यांसोबत हात मिळवणी करणार नाही. हे त्यांचे पक्के धोरण आहे. शरद पवार अशा प्रकारच्या कोणत्याही प्रवृत्तींना जवळ करणार नाहीत, हे मी आधीपण सांगितले होते. शाहु-फुले-आंबेडकर हे जसा राज्याचा विचार आहे, तसे बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे, महाराष्ट्र एकसंध ठेवण्याचा आणि महाराष्ट्राच्या शत्रूशी लढण्याचा. त्यामध्ये आम्ही तडजोड करणार नाही. जे काही संधीसाधू भाजपामध्ये गेले असतील त्यांचा विचारही आम्ही करत नाही. पण भाजपा असो किंवा शिंदे गट असेल त्यांना असे भ्रष्ट, व्यभिचारी, गुंड, दाऊदचे हस्तक असे लोक लागतात, असा आरोप राऊतांनी केला आहे.
तर, भाजपाने आता सलीम कुत्ताला संत म्हणून पदवी दिली पाहिजे. कारण ज्या व्यक्तीने भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे, ती व्यक्ती शिवसेनेत असताना त्यांनी सलीम कुत्तासोबत संबंध जोडून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आम्ही देशद्रोही लोकांसोबत काम करतो असा प्रचार केला. पण आता तुम्ही देशद्रोही लोकांच्या खिशामध्ये जाऊन बसला आहात. आम्हालाही हे लोक देशद्रोही म्हणाले होते, यांचे बापजादेसुद्धा नव्हते तेव्हापासून आम्ही या देशासाठी काम करत आहोत. भाजपाचा आता जन्म झाला आहे. माझ्या पक्षाला 60 वर्ष झाली आहेत, असे खडेबोल राऊतांनी सुनावले आहेत.
भाजपाचे नेते पलटूराम आहेत. भाजपा हा अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या विचाराचा मूळ पक्ष राहिलेला नाही. प्रफुल्ल पटेल यांचे दाऊदचा हस्तक इक्बाल मिर्चीसोबत संबंध आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. अशोक चव्हाण यांनी संरक्षण खात्याच्या जमिनी लाटल्या, देशांच्या सैनिकांशी गद्दारी केली, हे नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. पंतप्रधान मोदींनी श्वेतपत्रिका काढली होती. सलीम कुत्ता हे प्रकरण भाजपाने काढले, फडणवीसांनी एसआयटी लावली होती, त्या एसआयटीचे काय झाले? सलीम कुत्ताला तुरुंगातून आणून तुम्ही तुमच्या पक्षात आणले का? प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत सलीम कुत्ता वर्षा बंगल्यावर बिर्याणी खायला बसला होता का? या लोकांच्या मनातले प्रश्न आहेत, असे म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच भाजपावर जोरदार निशाणा साधला.
Comments are closed.