शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही, हा मर्दांचा महासागर आहे! शिवसेनेचं भय सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलंय!! – संजय राऊत

‘शिवसेनेचा आज 59 वा वाढदिवस आहे. एखादी संघटना, राजकीय पक्ष 59 वा वर्धापन दिन साजरा करतो, हे सोपे नाही. या प्रवासामध्ये अनेकदा संघर्ष, अडथळे, संकटे आली. पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना बलिदान करावे लागले. स्वत: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सुरुवातीच्या काळात तुरुंगवास भोगावा लागला. शिवसेनाप्रमुखांनी हे सर्व मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सहन केले आणि पुढे गेले. बाळासाहेबांनी हा पक्ष इतका पुढे नेला की त्या पक्षाचे भय सध्याच्या सत्ताधाऱ्यांना वाटले आणि त्यांनी निवडणूक आयोगाला, न्याय यंत्रणेला हाताशी धरून एखाद्या हिटलरप्रमाणे या पक्षावरती घाव घातला. असे असंख्य घाव पचवून शिवसेना 59 व्या वर्षात आलेली आहे’, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत गुरुवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
‘शिवसेनेची वाटचाल पुढे चालूच राहील. या संपूर्ण काळामध्ये अनेक नवे लोक आले. आमचे अनेक सहकारी आम्हाला सोडून गेले. तरीही हा पक्ष पुढे नेण्याचे ध्येय आणि कसब बाळासाहेबांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवले. शिवसेना विरोधी पक्षात उत्तम काम करत आली. जेव्हा सत्तेची जबाबदारी आमच्यावर आली तेव्हा सत्तेवर असताना सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे काम करून दाखवले. शिवसेनेचे भय हे सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आले. ते वाटायलाच हवे अशा पद्धतीने या संघटनेची बांधणी शिवसेनाप्रमुखांनी आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केली. आज शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन आहे. संध्याकाळी षण्मुखानंद सभागृह येथे वर्धापन दिन सोहळा साजरा होईल आणि प्रथेप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख हे शिवसैनिकांना मार्गदर्शन आणि पुढल्या राजकीय दिशेसंदर्भात महाराष्ट्राला संबोधित करतील, असेही राऊत यांनी सांगितले.
स्वानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ‘महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मजबुतीने उतरायला पाहिजे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि आम्ही एकत्रच आहोत. पण एकत्र राहताना शिवसेना आपला विचार आणि सत्व गमवणार नाही. मग तो विचार मराठी माणसाचा असेल, हिंदुत्वाचा असेल किंवा अन्यायाविरुद्ध लढण्याचा असेल. शिवसेनेची ताकद ही त्यांच्या विचार प्रणालीमध्ये आहे, स्वाभिमानामध्ये आहे. शिवसेना कधीही सत्तेसाठी कुणापुढे झुकली नाही, वाकली नाही आणि स्वार्थासाठी तडजोडी केल्या नाहीत. शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही, हा मर्दांचा महासागर आहे.’
संजय राऊत पुढे म्हणाले की, ‘देशात डी कंपनीचे राज्य सुरू आहे. डी म्हणजे डरपोक. दिल्लीत डरपोकांचे आणि महाराष्ट्रात खरोखरच्या डी कंपनीचे राज्य सुरू आहे. दाऊदपासून ते इक्बाल मिर्चीपर्यंत असे अनेक गुंड, त्यांचे हस्तक, देशद्रोही शक्तींना सोबत घेऊन ही डी कंपनी राज्य करत आहे. दोन्ही ठिकाणी डी कंपनीचे राज्य आहे. एका ठिकाणी प्रत्यक्ष दाऊद आणि एका ठिकाणी डरपोक. दोन्ही डी कंपनीविरुद्ध शिवसेना हा एकमेव पक्ष ताकडीने लढतोय आणि लढत राहील. काही लोक पाठीवर वार करून निघून गेले, पण हा छातीवर वार झेलणाऱ्यांचा पक्ष असून आम्ही छातीवर वार करून लढत राहू.’
Comments are closed.