जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू, आमच्यात संवाद आहे! – संजय राऊत
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे राज्यातील महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत यात कोणताही संदेह नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. ते नाशिक येथे माध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडीची डिलिव्हरी नॉर्मल आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे. 27 महापालिकांमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही एकत्र लढू. एकाद दुसऱ्या महापालिकेवर चर्चा होईल, बाकी जवळजवळ सर्व महापालिका एकत्र लढायला आमची हरकत नाही, असेही राऊत म्हणाले.
भाजपला दुसऱ्यांची पोरं खेळवण्याची हौस
तीन पक्षांचे सरकार असल्याने नॉर्मल डिलिव्हरी होत नाही, वेगळ लागतो आणि याचा राज्यकारभारावर परिणाम होतो, अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली. यावर बोलताना राऊत म्हणाले की, नॉर्मल डिलिव्हरी होत नाही तेव्हा प्रसुती तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. महायुती सरकारने यासाठी कुणाला नेमले आहे. अलिकडे केंद्र सरकार प्रे. ट्रम्प यांचा सल्ला घेतले. फडणवीसही असा कुणाचा सल्ला घेताहेत का? तिकडे कुणी गायनकोलॉजिस्ट आहेत का हे पहावे लागेल. कारण त्यांचे बाकीचे दोन जे सहकारी आहेत त्यांची नॉ़र्मल डिलिव्हरी कधीच झाली नाही किंवा ते वांझ आहेत आणि भाजपला दुसऱ्यांची पोरं खेळवण्याची हौस आहे. दुसऱ्यांची पोरं पाळण्यात घालून माझी पोरं म्हणून सांगतात. त्यापासून त्यांनी दूर राहिले पाहिजे. त्यांनी टेस्ट ट्यूब बेबीचा वापर करून काही होते का बघायला पाहिजे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
सैतानांच्या हातात लोकप्रतिनिधींची सभागृहं
ते पुढे म्हणाले की, नाशिकच नाही तर राज्यभरातील सर्वच महापालिकेत प्रशासकाच्या माध्यमातून सरकारने फक्त भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचाराची एक खिडकी योजना याच्या पलीकडे प्रशासकाने महाराष्ट्रातील 27 महापालिकांमध्ये कोणते भरीव काम केले असेल तर ते सांगावे. काल उत्तर महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महापालिकांसंदर्भात आमची चर्चा झाली. सरकारला विनंती आहे की, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याचे पालन करावे आणि सैतानांच्या हातात जी लोकप्रतिनिधींची सभागृहं आहेत ती मोकळी करून पुन्हा लोकांच्या हातात द्यावी. आमची तयारी सुरू आहे. त्यांनी कधीही निवडणुकांची घोषणा करावी. पण त्यांची ईव्हीएमची तयारी झालेली नाही. ईव्हीएमची तयारी पूर्ण झाली की नोटिफिकेशन काढले जाईल, असेही राऊत म्हणाले.
कुंभमेळ्यातील कामावरून दोन पक्षांमध्ये वाद
नाशिकच्या कुंभमेळ्यातील कामावरून दोन पक्षांमध्ये वाद सुरू आहे. दोन्ही युतीतले मंत्री आहेत. सरकारने कुंभमेळ्यासाठी 10-15 हजार कोटी मंजूर केले आहेत. यातले नक्की किती प्रत्यक्ष कामावर खर्च होतील याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त वाटा हा आमच्या हातात यावा आणि तो निवडणुकीत मत विकत घेण्यासाठी वापरता यावा यासाठी मारामाऱ्या सुरू आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. तसेच कुंभमेळ्याच्या तारखेवरून नाराजी व्यक्त करणाऱ्या साहू-महंत यांनी भ्रष्टाचारावरही परखड मतं मांडावी अशी मागणीही राऊत यांनी केली.
कुंभमेळ्यातल्या भ्रष्टाचारावर साधू महंतांनी भूमिका घेतली पाहिजे
कुंभमेळ्याच्या तारखांवरून साधू महंतांची नाराजी असली तरी साधू-महंत भाजपचाच टाळकुटेपणा करतात. साधू महंतांची नाराजी उघडपणे व्यक्त झाली पाहिजे. कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली पाहिजे. तारखा जाहीर होतील, पण ज्या पद्धतीची कुंभमेळ्यावरून नाशिकमध्ये साठमारी सुरू आहे त्याच्यावर साधू, महंत, महाराजांनी एक भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही आमच्या धर्माचे मार्गदर्शक आहात. जसे हिंदू धर्मातील काही शंकराचार्य हे अनेक विषयांवर आपली मतं परखडपणे मांडतात आणि दिशा देतात. तसे या नाशिक शहरातील प्रमुख साधू महंत महाराज यांनी लुटमारीवर आपली मतं मांडली पाहिजेत, असेही राऊत म्हणाले.
भूषण गवई यांच्याकडून कोणतीही शस्त्रसंधी होणार नाही
दरम्यान, मराठमोळ्या भूषण गवई यांनी 52 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, चंद्रचूडही महाराष्ट्रातील होते. पण चंद्रचूड आणि गवई यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे. महाराष्ट्राबद्दल चंद्रचूड न्याय करतील अशी आम्हाला अपेक्षा होती. पण न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याविषयी जे आम्ही अनेक वर्ष ऐकतोय, पाहतोय की ते सामान्य घरातून, संघर्ष करून इथपर्यंत सर्वोच्च पदावर पोहोचले. कालच त्यांची एक मुलाखत ऐकली, त्यामुळे मराठी माणूस म्हणून माझे मन भरून आले. त्यांनी परखडपणे सांगितले की, मी इथे विकत जायला बसलेलो नाही. मी सुद्धा निवृत्तीनंतर कोणतेही पद स्वीकारणार नाही. ज्याला अशा प्रकारचा मोह नाही, त्याला सरकार विकत घेऊ शकत नाही. मोदीच काय, प्रे. ट्रम्पसुद्धा त्याच्याकडून कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. कोणतीही शस्त्रसंधी भूषण गवई यांच्याकडून होणार नाही, असेही राऊत म्हणाले.
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी घेतली देशाच्या 52व्या सरन्यायाधीश पदाची शपथ
Comments are closed.