प्रशांत कोरटकर पळून गेला असेल तर ते गृहखात्याच्या मदतीशिवाय शक्य नाही, संजय राऊत यांची टीका

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेला प्रशांत कोरटकर हा दुबईला पळून गेल्याचे वृत्त समोर आले आहे. अद्याप याबाबत दुजोरा मिळालेला नसला तरी कोरटकरचे दुबईतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे.

”प्रशांत कोरटकर यांचा विषय महाराष्ट्रातल्या गृहखात्याच्या अखत्यारितला आहे. हे खातं देवेंद्र फडणवीस सांभाळतात. जे एक महान व्यक्तीमत्तव आहेत. त्यांची अलीकडीच वक्तव्य पाहिली तर त्यांच्या इतकं महान व्यक्तिमत्त्व या देशात नाहीए. कोरटकर हा नागपूरचाच आहे, दंगल नागपूरलाच झाली. त्यांच्या मतदारसंघातच दंगल झाली. दंगलीविषयी शंका व्यक्त करणाऱ्यांना मानसिक उपचाराची गरज असल्याचे ते बोलत होते. पण दंगल नागपूरलाच का झाली हा एकट्या संजय राऊत यांचा प्रश्न नाही. हा प्रश्न आदित्य ठाकरेंनीही विचारला. हा प्रश्न इम्तियाज जलिल यांनीही विचारला. फडणवीसांचं हे सरकार मानसिक रुग्णांचं सरकार आहे, त्यांच्यावर सामुदायिक मानसोपचार करण्याची गरज आहे. कोरटकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे. तो पळून गेला की नाही हे ते सांगतील. आम्ही म्हणालो तो पळून गेला आणि मग तो भाजपच्या एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडेल, कार्यालयात सापडायचा. वर्षा बंगल्यावर सापडायचा. भाजपच्या राजवटीत काहीही होऊ शकतं. खरोखर कोरटकर पळून गेला असेल तर गृहखात्याच्या मदतीशिवाय तो पळून जाऊ शकत नाही. फडणवीसांचे पोलीस किती सक्षम आहेत ते आपण पाहतोच. जे विरोधक आहेत त्यांना ते बरोबर पकडतात. पण या पोलिसांना कृष्णा आंधळे, कोरटकर सापडत नाही. एक असा आरोपी ज्याचा जामीन नाकारलेला आहे. ज्याने महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. तो पळून गेला. दंगलीतले आरोपी पकडले ना तुम्ही. पण ज्याला खरोखर पकडायचा होता तो पळून गेला. ज्या दिवशी त्याला कोर्टाने जामीन नाकारला तेव्हा तो नागपूरमध्येच होता. ही नागपूरच्या पोलिसांची जबाबदारी आहे. जर तो खरोखर पळून गेला असेल तर नागपूरच्या आयुक्तांचा राजीनामा घेतला पाहिजे किंवा त्यांची बदली केली पाहिजे. खरं म्हणजे गृहमंत्र्यांनी जबाब द्यायला पाहिजे पण आपले गृहमंत्री पतंग उडवत बसतात. पण पतंग फाटलीय त्यांची”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

”दंगल घडवणारी यांचीच लोकं आहेत. आमचं सरकार असताना दंगली घडल्या नाहीत. या आधीही मनोहर जोशी, नारायण राणे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही दंगली घडल्या नाहीत. शिवसेना फडणवीसांसोबत अशतानाही दंगल घडली नाही. आताच कशी दंगल घडली. औरंगजेबाची कबर उखडा लोकं तुमच्यासोबत आहेत त्यांच्यावर कारवाई करतायत का तुम्ही? दंगलीला खतपाणी घालणारी लोकं तुमच्या कॅबिनेटमध्ये आहेत, विधीमंडळात बसून, नरडी गरम करून वातावरण पेटवणारी लोकं तुमच्यासोबत बसले आहेत. तुम्ही चिल्ल्यापिल्ल्यांवर कारवाई केली. मुख्य आरोपी तुमच्या कॅबिनेट मध्ये बसले आहेत. म्हणून मी म्हणतो हे सरकार मानसिकदृष्ट्या भ्रष्ट, विकलांग व मनोरुग्ण झालं आहे. सरकारमध्ये जे आहेत त्यांच्यावर कारवाई का करू नये. सरकारमध्ये बसलेले त्यांचे बाप आकाशातून पडलेले आहेत का? तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही संयमाने वागलं पाहिजे व बोललं पाहिजे. ज्या पद्धतीची भाषा फडणवीसांचे सहकारी वापरतात ही भाषा महाराष्ट्राला शोभणारी नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.