Sanjay Raut Shivsena UBT on Ajit Pawar won in Malegav sugar factory election result
मुंबई : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलने शरद पवार यांच्या पॅनलचा दारुण पराभव केला. 21 पैकी 20 जागांवर अजित पवार यांच्या पॅनलचा विजय झाला. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 500 कोटी रुपयांचे आमिष दाखवल्याची टीका केली आहे. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे एका कारखान्याचे चेअरमन बनतात हे ऐतिहासिक आहे. यावेळी त्यांनी शिवसेना उबाठा गटाचेच नेते भास्कर जाधव यांच्यावरही भाष्य केले. (Sanjay Raut Shivsena UBT on Ajit Pawar won in Malegav sugar factory election result)
हेही वाचा : Andhare on Lonikar : खुशमस्करे नेत्यांची संख्या वाढत चाललीय, सुषमा अंधारेंचा लोणीकरांवर निशाणा
शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “एका कारखान्याचे चेअरमन राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनतात हे ऐतिहासिक गोष्ट आहे. 500 कोटी रुपयांचे आमिष दाखवले. ते 500 कोटी अजित पवार आपल्या खिशातून देणार आहेत का? ते पैसे सरकारच्या तिजोरीतूनच जाणार आहेत. बाकी इतर सर्व प्रकल्प तुम्ही रोखून ठेवलेले आहेत. त्याला द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. राज्यावर कर्जाचा भार वाढत चालला आहे. पण, आपल्या एका गावातील कारखान्यासाठी ते 500 कोटी रुपये द्यायला तयार आहेत. यालाच साध्या सोप्या भाषेत सरकारी पैशाचा अपव्यय आणि भ्रष्टाचार म्हणतात,” असे म्हणत त्यांनी यावेळी अजित पवारांवर टीका केली.
भास्कर जाधवांचे स्टेटस आणि संजय राऊत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. बुधवारी (25 जून) त्यांनी ठेवलेल्या स्टेटसची चांगलीच चर्चा झाली. यावर संजय राऊत म्हणाले की, “भास्कर जाधव हे चांगले वाचक आहेत. त्यामुळे त्यांची भाषा अत्यंत वैभवशाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अनेक नेत्यांना स्थान मिळाले नाही. सुनील राऊतांना देखील स्थान मिळाले नाही. त्यांचा हक्क होता म्हणून आम्ही रडत बसलो का? ती पक्षाची भूमिका आहे. सरकार आणण्यासाठी आमच्या कुटुंबाचे योगदान होते, पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात घेतले नाही. आपण समजून घेतले पाहिजे. आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले आणि ते सोडून गेले. चाणाक्ष, हुशार, तडफदार असे अनेक होते. त्यांना मंत्रीमंडळात घेण्याचा पक्षाने निर्णय घेतला आणि आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो,” असे ते म्हणाले. त्यांनी येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी, असा सल्लाही संजय राऊत यांनी भास्कर जाधव यांना दिला.
Comments are closed.