पंतप्रधानांनी कितीही अघोरी कृत्य केली तरी या देशाच्या लोकशाहीची हत्या करता येणार नाही; संजय राऊत यांचा घणाघात
‘या देशाच्या पंतप्रधानांनी कितीही प्रयत्न केले, कितीही अघोरी कृत्य केली तरी या देशाच्या लोकशाहीची हत्या करता येणार नाही. रण आजही या देशात असा एक समाज जिवंत आहे जो या सरकारला प्रश्न विचारायला घाबरत नाही, सरकारच्या दहशतीला घाबरत नाही, प्रसंगी तुरुंगात जायला तयार आहे आणि मरायलाही तयार आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सत्ताधाऱ्यांना सुनावले आहे. मुबंई मराठी पत्रकार संघात आज फॅसिस्ट हुकुमशाहीविरोधी सभा पार पडली. या सभेत शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केलेल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. ‘
”मुंबई मराठी पत्रकार संघात सध्याच्या हुकुमशाही विरुद्ध तुतारी फुंकण्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतला आहे. फ्रेंड्स ऑफ डेमोक्रसी म्हणजेच लोकशाहीचे सर्व मित्र या व्यासपीठावर व समोर उपस्थित आहेत. हुकुमशाही ही अमानुषतेचं कोणतं टोक गाठू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्वेता संजीव भट व त्यांचे कुटुंब सहन करत असलेल्या यातना आहे. एक पत्नी, एक आई गेल्या सात वर्षांपासून आपल्या पतीसाठी जो संघर्ष करतेय, हा या देशाच्या लोकशातील एक मोठा काळा अध्याय आहे. भाजपचे लोक बोलतायत आणीबाणी देशाच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. मी ते मानत नाही. असे बरेचसे अध्याय या देशात झाले आहेत. या देशात 78 वर्षी निशस्त्र महात्मा गांधींची हत्या झाली आणि आजही त्या खून्यांना गौरवण्यात येतं तो एक मोठा काळा अध्याय. दुसरा काळा अध्याय डोनाल्ड ट्रम्पच्या दबावाखाली या देशाचा पंतप्रधान सरेंडर झाला हा त्याहूनही मोठा काळा अध्याय आहे. आम्हाला आणिबाणी काय सांगताय. श्वेता भट सारख्या महिला जो संधर्ष करतायत त्यांच्यावर जो अन्यायाचा बुलडोजर फिरवला जातोय तो देखील एक काळा अध्याय आहे, असे संजय राऊत यांनी सुनावले.
”या देशाच्या पंतप्रधानांनी कितीही प्रयत्न केले, कितीही अघोरी कृत्य केली. तरी या देशाच्या लोकशाहीची हत्या करता येणार नाही. ही लोकशाही मरणार नाही. कारण आजही या देशात असा एक समाज जिवंत आहे जो या सरकारला प्रश्न विचारायला घाबरत नाही, सरकारच्या दहशतीला घाबरत नाही, प्रसंगी तुरुंगात जायला तयार आहे आणि मरायलाही तयार आहे. इंदिरा गांधींनी जी आणिबाणी केली ती देशाची गजर होती. जयप्रकाश नारायण असतील, मोरारजी देसाई यांनी तेव्हा सैन्याला सांगितलेले की सरकारचे आदेश पाळू नका. तुम्ही हे जेव्हा सांगता तेव्हा तुम्हाला देशात अराजक निर्माण करायचं आहेत. तेव्हा त्या अराजकाच्या मागे परकीय ताकद असते. देशाचा कोणताही पंतप्रधानांना व राष्ट्रपतींना संविधानाने दिलेल्या सेक्शन 352 A, नुसार जेव्हा देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात येते, देश तोडण्याचे प्रयत्न होतात तेव्हा अशाप्रकारे आणिबाणी लावण्याचे अधिकार संविधानाने दिलेले आहेत. त्यामुळे त्याला काळा अध्याय म्हणता येणार नाही. जर तुम्ही संविधानानुसार लावलेल्या आणिबाणीला काळा अध्याय म्हणताय म्हणजे तुम्ही संविधानाला काळा अध्याय म्हणताय. तुम्ही संविधानाचा अपमान करताय. इंदिरा गांधींनी संविधानाच्या अखत्यारित राहून कायद्याच्या अखत्यारित राहून केलेली ही कृती होती. मागच्या 11 वर्षात जी अघोषित आणिबाणी सुरू आहे त्याला काळा अध्याय म्हणायला पाहिजे. गेल्या 11 वर्षातील आणिबाणीने काय काय नाही पाहिले, गुजरातमध्ये पटेल आंदोलन बघितले, त्यानंतर याच पटेल आंदोलनाचा नेता हार्दीक पटेलला तुम्ही विकत घेतला. ही पण आणिबाणी आङे. हरयाणा व उत्तर प्रदेशात जाटांचं आंदोलन बघितलं, महाराष्ट्रात मराठ्यांचं आंदोलन बघितलं. गुर्जरांचं आंदोलन बघितलं. ही सर्व आंदोलन तुम्ही चिरडून टाकली. ही आंदोलनं का झाली. तर त्य़ा त्या वर्गाचे हक्क आधिकार आपण मारले, असे संजय राऊत म्हणाले.
”नोटबंदीसारखा हुकुमशाहीचा अत्याचारी प्रकार दुसरा झाला नसेल. जगातील सर्वात मोठा अत्याचार कुठला असेल तर मोदींनी तुघलाकप्रमाणे जाहीर केलेली नोटबंदी आहे. सामान्य लोकांची कमाई देखील ओरबाडून घ्यायचा प्रयत्न झाला. लोकं कित्येक महिने बँकाच्या बाहेर उभे होते, त्यातच ते मेले. ही हुकुमशाही नाहीतर काय आहे, सामान्य माणसाने तुमचं गुलाम व्हावं, रुपया दोन रुपयासाठी तुमच्या दारात यावं याला हुकुमशाही नाही तर काय म्हणायचं. शेतकरी तीन काळया कायद्यांविरोधात आंदोलन करत होते. त्यातही शेकडो शतेकरी मारले गेले. तरीही सरकार द्रवल नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
”हे इमरजन्सीवाले म्हणतात की त्या अठरा महिन्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक झाली. मला वाटतं काही लोकं त्या लायकीचेच होते. ते कधीच सुटायला नको होते. तर हा देश खूप पुढे गेला असता. गेल्या अकरा वर्षात मोदीच्या काळात विरोधी पक्षाचा कोणता नेता आहे ज्याचा भाजपच्या हुकुमशाहीने छळ केला नाही. शिवसेना, राजद, राष्ट्रवादी, आप असा कोणता पक्ष नाही ज्यांना तुरुंगात टाकलं नाही. ज्यांचा छळ केला नाही. ज्याने तुम्हाला हवी तशी फाईल तयार केली नाही, रेकॉर्ड तयार केला नाही त्यामुळे सात वर्ष झाले संजीव भट तुरुंगात आहे. त्यांना जामीन मिळू देत नाहीए. या सगळ्या दहशतीचा वापर करून तुम्ही सरकार पाडली, आमदार खासदार विकत घेतले. शिवेसना राष्ट्रवादी सारखे मूळ पक्ष कुणाच्या तरी हातात सुपूर्द केले. निवडणूक आयोग तुमच्या टाचेखाली. न्यायालय तुमच्या टाचेखाली आहे. तुम्ही हवा तो निर्णय देतायत ही हुकुमशाहीच्या पुढली गोष्ट आहे. ईडी इनकमटॅक्सने असंख्य लोकांवर खोट्या केसेस टाकल्या. ज्यांच्यावर केसेस टाकल्या त्यांना आपल्या पक्षात घेतलं. दाऊद इब्राहिमच्या लोकांना देखील पक्षात घेतलं. काही जण गेली वर्षानुवर्ष जेलमध्ये आहेत. संजीव भट यांच्यासारखेच सिद्धी कोपन, शार्जिल इमान, उमर खलिद, साई बाबा तुरुंगात होते. स्टेन स्वामी तर तुरुंगातच मेले ही आणि बाणी नाही तर काय. ही कायदेशीर आणिबाणी नाही. मी कायदेशीर आणिबाणीचं स्वागत करतो, असे संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.