मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जास्त…; BMC निवडणुकीवर शरद पवार यांचं मोठं विधान

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. मुंबईत आम्हा सर्वांमध्ये शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ताकद जास्त आहे, असे शरद पवार म्हणाले. माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवारांनी हे विधान केले.
महाविकास आघाडी म्हणून मुंबईत एकत्र लढणार की वेगळे? असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर उत्तर देत शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. “अजून काही चर्चा झालेली नाही. पण मुंबईमध्ये आमच्या सगळ्यांमध्ये अधिक ताकद ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आहे. त्यामुळे त्यांना त्यात विचारात घ्यावं लागेल”, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
“सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला आहे. त्या निकालानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवता येणार नाहीत. त्यामुळे साधारणतः तीन महिन्यांच्या आत ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. त्यात आम्ही सगळे सहभागी होऊ. आमचा प्रयत्न आहे, निर्णय अद्याप नाही, कारण आम्ही अजून चर्चा केलेली नाही. काँग्रेस आहे, आमचा पक्ष आहे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहे आणि शेतकरी कामगार पक्ष आणि इतर छोटे पक्ष आहेत. आम्ही एकत्र बसू. आणि एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का? याचा विचार करू. त्याचा अंतिम निर्णय करू. एकत्र निवडणूक लढवायची इच्छा आहे”, असे शरद पवार म्हणाले.
देशाला पंतप्रधान नाही… भाजपला आहे; उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला
Comments are closed.