मुंबईत उद्धव ठाकरे यांची ताकद जास्त – शरद पवार

मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठे विधान केले. महाविकास आघाडीमध्ये मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ताकद जास्त आहे. त्यामुळे आगामी निवडणूक मुंबईत कशी लढायची याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे शरद पवार म्हणाले.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे अपरिहार्य असल्याने निवडणुका येत्या तीन महिन्यांत लागतील अशी शक्यता शरद पवार यांनी वर्तवली आहे.

हिंदीची सक्ती आणि द्वेषही नको

हिंदी भाषेच्या सक्तीबाबतही शरद पवार यांनी या वेळी प्रतिक्रिया दिली. ‘‘हिंदी भाषेची सक्ती असू नये, पण हिंदी भाषेचा द्वेष करणेही विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. एखाद्याला येत असेल किंवा तो शिकत असेल तर नाही बोलण्याचे कारण नाही. विद्यार्थ्याला जे आवडेल ते त्याने करावे. पालकांच्या मार्गदर्शनानुसार त्याने निर्णय घेतला पाहिजे,’’ असे शरद पवार म्हणाले. देशातील 55 ते 60 टक्के लोक हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवादासाठी हिंदी भाषेकडे दुर्लक्ष होऊ नये, पण सक्ती करणे योग्य नाहीच, असेही ते पुढे म्हणाले.

Comments are closed.