Sharad Pawar told the story about the law of giving share in property to daughter
(Sharad Pawar) पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात ‘यशस्विनी सन्मान सोहळ्या’त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांसंदर्भात देशातील पहिले धोरण हे महाराष्ट्रात तयार करण्यात आले, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावेळी सांगितले. काही निर्णय घेताना अनेक वेळेला कुठे ना कुठेतरी विरोध होतो. मानसिकता बदलायची आवश्यकता असते. समाजातील पुरुष वर्गाची मानसिकता त्या काळात बदलली नव्हती. हल्ली सुद्धा तीच मानसिकता आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये बघायला मिळते, असे सांगून त्यांनी वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीच्या हिश्श्यासंदर्भातील कायद्यामागची कहाणी सांगितली. (Sharad Pawar told the story about the law of giving share in property to daughter)
मुख्यमंत्री असताना, वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीचा सुद्धा हिस्सा असला पाहिजे, असा ठराव आणला होता. जे मुलाला देता, ते मुलीला द्यायला पाहिजे, असे माझे मत होते. मंत्रिमंडळामध्ये त्यावर चर्चा झाली. काही लोकांना ते आवडले, काहींना ते आवडले नाही. पण मुख्यमंत्री आग्रही आहेत, हे पाहून सगळे शांत बसले आणि संमती दिली, असे शरद पवार म्हणाले.
विधानसभेमध्ये हा कायदा आणि त्याचे प्रारूप मांडले गेले. तास-दोन तास मी सभागृहात बसलो, संध्याकाळचे पाच-सहा वाजले होते. मला काही दुसरे काम आहे, म्हणून मी जातो. कितीही वाजले तरी चालेल, पण हा कायदा तुम्ही मंजूर करून घ्या, असे मी माझ्या सहकाऱ्यांना म्हणालो. सगळेजण ‘हो’ म्हणाले. रात्री 9 वाजले तरी सभागृहाचे कामकाज सुरू होते. नंतर त्या प्रस्तावित कायद्यावरची चर्चा वाढली आणि अनेक सदस्यांना, ‘वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीला सुद्धा हिस्सा द्यावा’ ही कायद्यातील दुरुस्ती मंजूर नव्हती, असे पवार म्हणाले.
हेही वाचा – Prakash Ambedkar : माझ्या सर्व शंका आज प्रत्यक्षात आल्या; निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयावर आंबेडकरांची टीका
साडेनऊच्या सुमारास संसदीयमंत्र्यांकडून फोन आला आणि साहेब काही लोक ऐकत नाहीत. त्यामुळे हे बिल मंजूर होईल असे दिसत नाही, असे मला सांगण्यात आले. कोण ऐकत नाहीत? असे मी विचारल्यावर त्यांनी पाच-सहा आमदारांची नावे घेतली. मी त्यांना म्हणालो, या स्रर्वांना गाडीत घाला आणि माझ्याकडे आणा. ते लोक माझ्याकडे आले, मी त्यांना समजावून सांगत होतो. ते काही मान्य करायला तयार नव्हते. यामुळे बहीण भावाचे नाते खराब होईल, कुटुंबात मतभेद होतील, असा त्यांनी दावा केल्याचे शरद पवार म्हणाले.
मी त्यांना विचारले की, तुझ्या मुलाला जे काही देणार तसे मुलीला दिले तर नुकसान काय? पण ते काही ऐकायला तयार नव्हते. त्यांना मी सहज विचारले की, तुम्हाला मुले किती? ते म्हणाले, दोन. मी म्हणालो, काय वय आहे? त्यांनी सांगितलं एकाचे 24 आणि दुसऱ्याचे 26. मग त्यांचे लग्न केले आणि उद्याच्याला सोनू तुझ्या घरामध्ये आली तर, तिच्या वडिलांच्या प्रॉपर्टीत तिला काहीतरी वाटा मिळेल. तुला काहीही न करता तो वाटा तुझ्याकडे येईल. सुनेला मिळाले म्हणजे तुझ्या घरात आले. त्यांनी सांगितले, खरे आहे, आमच्या लक्षातच आले नाही. अशा रीतीने ते सहमत झाले म्हणून तो कायदा झाला, अशी आठवण त्यांनी सांगितले.
सांगायचं तात्पर्य असं की, काही लहान प्रश्नांबाबत सुद्धा काही पुरुषांची मानसिकता बदल स्वीकारण्यास तयार नसते. त्यामुळे अशा गोष्टींना विरोध होतो. सुदैवाने महाराष्ट्रामध्ये हा कायदा आपण केला. महिलांना अधिकार दिले ते निव्वळ या कायद्याने प्रॉपर्टीत नाही तर सत्तेमध्ये सुद्धा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये महिलांना अधिकार देण्याचा निकाल देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात केला गेला, असे शरद पवार म्हणाले.
हेही वाचा – Nitesh Rane : मी मुख्यमंत्री होण्याची वाट पाहू नका; फडणीसांचे नाव घेत काय म्हणाले नितेश राणे?
Comments are closed.