रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात २३ हजार बोगस मतदार, उपनेते बाळ माने यांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब

देशात मतदान चोरीचा विषय गाजत असतानाच रत्नागिरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी रत्नागिरीत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूनीवर निवडणूक शाखेला घाम फोडला आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात तब्बल २३ हजार बोगस मतदार असल्याचा खळबळजनक आरोप आज उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी केला. हे २३ हजार बोगस मतदार नावे रद्द करत नाहीत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ देणार नाही, असा इशारा बाळ माने यांनी दिला. तसेच बोगस मतदार यादी पेन ड्राईव्हतून त्यांनी पत्रकारांना दिली.
उपनेते बाळ माने म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळीच आम्हाला ही माहिती मिळाली होती. आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे आणि निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार करताना बोगस मतदार यादी दिली होती. त्यामध्ये दुबार मतदार नावांचा समावेश होता. निवडणूक निरीक्षकांनी आमची बाजू ऐकूनच घेतली नसल्याचा आरोप बाळ माने यांनी केला. यावेळी जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शहरसंघटक प्रसाद सावंत आणि माजी नगरसेविका रशीदा गोदड उपस्थित होत्या.
उमेदच्या अधिकाऱ्यांचा निवडणुकीत गैरवापर
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात उमेदच्या अधिकाऱ्यांचा निवडणुकीच्या काळात वापर करून बचत गटांना आमिष दाखवण्याचे काम केले. रत्नागिरीतही एक अधिकारी उदय सामंत यांच्या प्रचाराचे काम करत होत्या, असा खळबळजनक आरोप बाळ माने यांनी केला. निवडणूकीपूर्वी सव्हेमध्ये उदय सामंत यांचा टांगा पलटी होणार, असा अहवाल असताना अचानक बदल कसा झाला. काही बोगस मतदारांचा त्यांनी आधार घेतल्याचा संशय बाळ माने यांनी व्यक्त केला. हा धोका आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्भवू शकतो. त्यामुळे सर्व भावी उमेदवारांनी जागृत रहावे. मतदार यादीतील बोगस मतदार नावे रद्द करावीत, अशी मागणी त्यांनी केली.
रस्त्याची कामे आरडी सामंत कंपनीकडे
रत्नागिरीतील रस्त्यांची चाळण झाली आहे. नव्याने तयार केलेले सिमेंटचे रस्ते खराब झाले आहेत. खराब झालेल्या रस्त्याची जबाबदारी ही ठेकेदाराची असते. नगरपरिषदेने हे सर्व रस्ते ठेकेदाराकडून करून घ्यावेत. रत्नागिरीतील रस्त्यांच्या कामाबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी श्वेतपत्रिका काढावी. या रस्त्यांची ठेकेदार आर डी सामंत कन्सट्रक्शन कंपनीच आहे. त्यांचे एक सुपुत्र उद्योगमंत्री आणि एक सुपुत्र आमदार आहेत. यांनी दुसरा ठेकेदार निर्माण केला नाही, फक्त लाभार्थी बनवून कामं वाटप करत राहिले, असा आरोप बाळ माने यांनी केला. रस्त्यांवरील खड्ड्यांच्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकासोबत शनिवारी बारा वाजता १० मिनिटे चक्का जाम करणार असल्याचे बाळ माने यांनी सांगितले.
Comments are closed.