शेतकर्‍यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा! उद्धव ठाकरे यांची मागणी

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे. तर 30 जून 2026 च्या आत कर्जमाफी देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. अशा परिस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रातून केली आहे.

कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचला आहे. निसर्ग कोपलाच आहे. त्यात संवेदना नसलेल्या सरकारचा तुघलकी कारभार; अशा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना पुन्हा एकदा सरकारने लोणकढी थाप मारून वेळ काढायचा प्रयत्न केला आहे. कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांना जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे त्यातून पुढील प्रश्नांची उत्तरे मिळतील काय? शेतकर्‍यांची दैनावस्था समोर दिसत असताना तुमची परदेशी समिती नेमका कसला अभ्यास करून अहवाल देणार? पुढच्या वर्षी जूनमध्ये जर खरंच कर्जमाफी होणार असेल तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते भरायचे का? पुढील वर्षी जुनच्या कर्जमाफीत हे हप्ते माफ होणार असतील तर ते का भरायचे? ते न भरता शेतकर्‍यांना रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे का? जर नव्याने कर्ज मिळणार असेल तर ते देखील माफ होणार का? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

इतर मदत करण्याआधी खरडून गेलेली जमीन पूर्ववत करण्यासाठी शेतकरी माती मागतो आहे. पण त्याविषयी सरकार काहीच करायला तयार नाही. जगाचे पोट भरणारा शेतकरी आज भयंकर संकटात सापडला आहे. पाऊस अजूनही शेतकर्‍यांची पाठ सोडायला तयार नाही. सरकारने हजारो कोटींच्या नुकसानभरपाईची घोषणा केली; पण शेतकर्‍यांच्या खात्यावर किती पैसे जमा झाले हा प्रश्नच आहे.

महाराष्ट्रात सहा महिन्यांपासून पाऊस पडतो आहे. शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. कर्जमुक्ती देण्याची यापेक्षा आणखी ‘योग्य वेळ’ कोणती असू शकते? तरीही योग्य वेळ आल्यावर कर्जमुक्ती देऊ असे सांगून सरकारने जो वेळकाढूपणा चालवला आहे, ती शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा आहे. मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातून सातत्याने शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत. आत्महत्यांचे हे वाढते आकडे सरकारच्या कानावर आदळत नाहीत काय? तरीही सरकारने कर्जमुक्तीसाठी पुढच्या वर्षी जूनचा मुहूर्त काढावा, हे चीड आणणारे व शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांचे पुन्हा आश्वासन… 30 जून 2026 च्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी, नागपुरातील शेतकरी आंदोलनाचा आज निर्णय

कर्जमुक्तीसाठी चालढकल करून हे सरकार शेतकर्‍यांना मृत्यूच्या दारात ढकलत आहे. जूनपर्यंत होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार आहे काय? सरकार शेतकर्‍यांना केवळ खेळवत आहे. थोडक्यात शेतकर्‍यांच्या आत्ताच्या हालअपेष्टा तशाच राहणार, पुढच्या जूनचा गुळ सरकारने शेतकर्‍यांच्या कोपराला लावला आहे. आत्ता आवाज करायचा नाही, असेच बहुदा सरकारला सांगायचे असावे. शेतकर्‍यांना फसवण्याचे हे खेळ बंद करा आणि अभूतपूर्व संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

Comments are closed.