आम्ही कुठंही जिंकू शकतो, शुभमन गिलचा आत्मविश्वास, इंग्लंडला थेट इशारा
Shubman Gill Press Conference in Marathi : शुभमन गिलच्या नेतृत्त्वात युवा टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी उद्यापासून होणार आहे. शुभमन गिलकडे रोहित शर्मानं निवृत्ती घेतल्यानंतर कसोटी संघाचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं आहे. या मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन या सारखे दिग्गज क्रिकेटपटू टीम इंडियाचा भाग नसतील. उद्यापासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी शुभमन गिलनं पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी त्यानं विविध विषयांवर भाष्य केलं. कसोटी मालिका जिंकणं हा आयपीएल जिंकण्यापेक्षा मोठा विजय असल्याचं गिलनं म्हटलं. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकणं हे आयपीएल स्पर्धा जिंकण्यापेक्षा मोठं असतं, असं शुभमन गिल म्हणाला.
कसोटी मालिका जिंकणं महत्त्वाचं
शुभमन गिलला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणं आणि आयपीएल ट्रॉफी जिंकणं यात कशाला प्राधान्य देणार असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना शुभमन गिलनं निश्चितपणे कसोटी मालिका जिंकणं, तुम्हाला कॅप्टन म्हणून इंग्लंडचा दौरा करण्याची अधिक संधी मिळत नाही. तुम्ही सर्वोत्कृष्ठ खेळाडू असेल तर तुम्हाला दोन ते तीन दौरे नेतृत्त्व करायला मिळतं. आयपीएल दरवर्षी होतं, प्रत्येक वर्षी संधी मिळते. माझ्या मते आयपीएल जिंकण्यापेक्षा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विजय मोठा असतो, असं शुभमन गिल म्हणाला.
आम्ही कुठंही जिंकू शकतो
इंग्लंडमध्ये लाल बॉलचा सामना करण्याचा अनुभव फारसा नसला तरी शुभमन गिल त्याच्या समोर असलेल्या आव्हानापासून विचलित झालेला नाही. तो म्हणाला, अनेक जण म्हणतात तुमच्या टीमजवळ पुरेस अनुभव नाही, मात्र, चांगली गोष्ट ही आहे की आमच्यावर अपेक्षांचं ओझं नसेल, कारण आमच्या संघातील बहुतेक खेळाडू इंग्लंडमध्ये खेळलेला नाही, यामुळं खूप फरक पडेल, असं गिल म्हणाला. गेल्या पाच ते दहा वर्षात आमच्या वरिष्ठ खेळाडूंकडून आम्हाला जी ब्लू प्रिंट मिळाली आहे ती ही आहे की आम्ही जिंकू शकतो. आम्ही त्याच आत्मविश्वासानं खेळण्याचा प्रयत्न करु, असं गिलनं म्हटलं.
शुभमन गिल चार नंबरवर खेळणार
शुभमन गिल म्हणाला तो आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या चर्चेनुसार विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर त्यानं चौथ्या स्थानावर खेळणं आवश्यक आहे. विराट भाईच्या कसोटीतील निवृत्तीनंतर मी आणि गौतम गंभीर भाईनं यावर चर्चा केली आणि चौथ्या स्थानावर खेळण्याबाबत आमच्यात एकमत झालं की चौथ्या स्थानावर खेळायला पाहिजे, असं शुभमन गिल म्हणाला.
संघात सुरक्षेचं वातावरण महत्त्वाचं
शुभमन गिल पुढं म्हणाला की संघात सुरक्षेचं वातावरण बनवण्याचा प्रयत्न असेल ज्यामुळं खेळाडू त्यांची सर्वोत्कृष्ठ कामगिरी करु शकतील. जर आम्ही असं करण्यात यशस्वी ठरलो तर कसोटी मालिका आणि डब्ल्यूटीसीच्या सायकलमध्ये आम्ही यशस्वी होऊ, खेळाडूंसोबत स्पष्ट संवाद साधण्याची गरज आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे, हे सांगणं गरजेचं आहे. खेळाडूंना त्यांचा नैसर्गिक खेळण्याची सूट मिळायला हवी, असं शुभमन गिल म्हणाला.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून आयपीएलमध्ये सल्ला घेतला
शुभमन गिल म्हणाला की आयपीएल सुरु असताना इंग्लंड दौऱ्याच्या तयारी संदर्भात विराट कोहली आणि रोहित शर्माकडून सल्ला घेतला होता. तो म्हणाला मी आयपीएल दरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्माला भेटलो होतो, त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले, त्यातील प्रामुख्यानं इंग्लंडमधील अनुभव होते. इग्लंड विरुद्ध आम्ही भारतात मालिका खेळली होती ती माझी सर्वोत्तम होती, ज्यामध्ये आमचे ज्येष्ठ खेळाडू प्रत्येक मॅचमध्ये उपलब्ध नव्हते.
आणखी वाचा
Comments are closed.