आरओ-के चे विश्वचषक स्वप्ने सोपे नाहीत! सौरभ गंगुली
रोहित-कोहली अर्थातच रो-कोचे 2027 च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचे स्वप्न असले तरी ते आता सोपे राहिले नाहीये. 2027 च्या वर्ल्ड कपला अजून 27 महिने शिल्लक आहेत आणि तोपर्यंत फिटनेस राखणे व संघात आपले स्थान पक्के करणे या दोन्ही गोष्टी सोप्या नसतील, अशी भविष्यवाणी हिंदुस्थानचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने वर्तवली आहे.
आयसीसीचा पुढचा वर्ल्ड कप 2027 साली दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्यात होणार आहे. या वर्ल्ड कपपर्यंत कोहली 38 वर्षांचा होईल, तर रोहित चाळीशी गाठेल. या दोघांनी आपली शेवटची इच्छा वन डे वर्ल्ड कप खेळण्याची जाहीर केली आहे. तेव्हापासून सर्वांच्या नजरा या दोघांकडे वेधल्या गेल्या आहेत. कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झालेले दोघे आता केवळ वन डे खेळणार आहेत. केवळ वन डे खेळणे दोघांसाठीही आव्हानात्मक असणार, यात वाद नाही. पुढील अडीच वर्षे ते स्वतःचा फॉर्म आणि फिटनेस कसा राखतात, हेसुद्धा महत्त्वाचे असेल.
खेळण्याचा निर्णय दोघांच्याच हाती
एक ना एक दिवस खेळ प्रत्येकापासून दूर होतोच आणि ते खेळापासून दूर होतात. हे प्रत्येकाने जाणून घ्यायला हवे. आता विराट आणि रोहितला वर्षाला केवळ 15 सामने खेळायचे आहेत. हे नक्कीच सोपे नसणार. या दिग्गजांना माझा कोणताही सल्ला नाही. ते आपला खेळ योग्यप्रकारे समजतात. तेच त्यांच्या कारकीर्दीचा निर्णय घेण्यास सक्षम असल्याचे गांगुली म्हणाला.
विराटसारखा खेळाडू मिळणे कठीण
विराट कोहलीसारखा जिगरबाज आणि स्फूर्तिदायक खेळाडू मिळणे कठीण आहे. मात्र विराट आणि रोहितच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर हिंदुस्थानी क्रिकेटच्या भवितव्याबाबत आपण चिंतित नसल्याचेही गांगुलीने स्पष्ट केले. नक्कीच विराट एक अद्भुत खेळाडू आहे. त्याचा पर्याय शोधण्यासाठी हिंदुस्थानी क्रिकेटला काही काळ लागेल, परंतु मी त्यासाठी हैराण नसल्याचेही सांगितले.
युवराजला कमी संधी मिळाली
अष्टपैलू युवराज सिंह हा हिंदुस्थानी क्रिकेटचा एक स्पेशल खेळाडू होता. त्याने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये आपल्या अष्टपैलूत्वाची किमया दाखवली. मात्र त्याला पारंपरिक क्रिकेटमध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी फार संधी मिळू शकली नाही. त्याने वन डे क्रिकेटमध्ये हिंदुस्थानी क्रिकेटसाठी जे काही केले, ते अविश्वसनीय होते. तो 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपचा प्लेअर ऑफ दी सीरिज होता. 2011 च्या वन डे वर्ल्ड कपचा प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट होता. या कमनशिबी खेळाडूला कसोटीत फार आजमावले गेले नाही. तो फक्त 30 कसोटींतच खेळला. तो सचिन, द्रविड, मी आणि लक्ष्मण यांच्यात अडकून फसला, पण तो एक वेगळाच खेळाडू होता.
Comments are closed.