मालिका जिंकताच सूर्यकुमार यादव ट्रॉफी घेऊन ‘त्या’ खेळाडूकडे पोहोचला; पाहून सगळेच हैराण झाले, ने

सूर्यकुमार यादव यांनी शाहबाज अहमदला ट्रॉफी दिली : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2025 वर्षांचा शेवट दणक्यात केला. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या पाचव्या टी20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 30 धावांनी पराभूत करत पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. टीम इंडियामध्ये परंपरेनुसार मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफी संघातील सर्वात युवा किंवा मालिकेत पदार्पण करणाऱ्या नवख्या खेळाडूला दिली जाते. मात्र यावेळी हा नियम मोडला गेला. शुभमन गिलच्या सल्ल्यावरून कर्णधार सूर्यकुमार यादवने ट्रॉफी थेट 31 वर्षीय शहबाज अहमदकडे सोपवली. ट्रॉफी मिळताच शहबाज स्वतःही थक्क झालेला दिसला. या खास क्षणाचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

मॅचनंतर प्रेझेंटेशनमधून ट्रॉफी घेऊन संघाकडे जाताना सूर्यकुमार यादव क्षणभर गोंधळलेला दिसत होता, ट्रॉफी नेमकी कोणाला द्यायची? तेवढ्यात शुभमन गिलने त्याला शहबाज अहमदला ट्रॉफी देण्याचा सल्ला दिला. अक्षर पटेल जखमी झाल्यानंतर रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून शहबाजची संघात एन्ट्री झाली होती. मात्र त्याला या मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. शहबाज अहमदने आतापर्यंत भारतासाठी दोन टी20 सामने खेळले असून, त्यात त्याने दोन विकेट्स घेतल्या आहेत. 2023 मध्ये त्याने टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

सामन्यात काय घडलं?

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 231 धावांचा डोंगर उभारला. शुभमन गिल दुखापतीमुळे बाहेर असल्याने संजू सॅमसनने अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात केली. संजूने 22 चेंडूत 37 धावा केल्या, तर अभिषेकने 21 चेंडूत 34 धावा करत चांगली साथ दिली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या तिलक वर्माने 72 धावांची शानदार खेळी साकारली. तिलकसोबत हार्दिक पांड्यानेही महत्त्वाची भूमिका बजावली. हार्दिकने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावत 25 चेंडूत 252 च्या स्ट्राइक रेटने 63 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यांच्या या इनिंगमध्ये 5 चौकार आणि 5 उंच छक्क्यांचा समावेश होता. मात्र कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि केवळ 7 चेंडूत 5 धावा करून बाद झाला.

232 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही आक्रमक झाली. सातव्या ओव्हरमध्ये 69 धावांवर त्यांना पहिला धक्का बसला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने धोकादायक क्विंटन डी कॉकला 65 धावांवर बाद करत सामना फिरवला. अखेर दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 201 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि भारताने हा सामना 30 धावांनी जिंकत मालिका आपल्या नावावर केली.

हे ही वाचा –

Team India Squad For T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद जाणार?; अजित आगरकरांची पत्रकार परिषद, टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची आज घोषणा

आणखी वाचा

Comments are closed.