'तारागिरी' 3 एप्रिलला लाँच होणार आहे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय नौदल आपली नवीनतम स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ (एफ41) 3 एप्रिल 2026 रोजी नौदलात दाखल करण्याच्या तयारीत आहे. भारताच्या सागरी सार्वभौमत्वासाठी हा एक ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. विशाखापट्टणम येथे होणाऱ्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान माननीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह भूषवतील. पूर्णपणे आत्मनिर्भर नौदल शक्ती बनण्याच्या दिशेने राष्ट्राने केलेल्या प्रयत्नांची ही एक प्रभावी साक्ष असणार आहे.
प्रोजेक्ट 17ए वर्गातील चौथी शक्तिशाली युद्धनौका म्हणून ‘तारागिरी’ची ओळख बनणार आहे. 6,670 टन वजनाची ही युद्धनौका ‘मेक इन इंडिया’ झलक असून आपल्या स्वदेशी जहाजबांधणी केंद्रांच्या अत्याधुनिक अभियांत्रिकी क्षमतेचे प्रतीक आहे. मुंबईस्थित माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) द्वारे बांधलेली ही युद्धनौका, तिच्या आधीच्या डिझाइनच्या तुलनेत एक पिढीजात उक्रांती दर्शवते. तिचा आकार अधिक सुव्यवस्थित असून तिचा रडार क्रॉस-सेक्शन कमी आहे. या वैशिष्ट्यामुळे ती प्राणघातक स्टेल्थ तंत्रज्ञानासह कार्य करू शकते. 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीने बांधलेली ही युद्धनौका देशांतर्गत औद्योगिक परिसंस्थेची परिपक्वता दर्शवते. 200 हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आता या कामात सहभागी आहेत. या माध्यमातून भारत सरकारच्या आत्मनिर्भरता उपक्रमात योगदान मिळाले असून हजारो भारतीयांना रोजगार प्राप्त झाले आहेत.
तारागिरी आधुनिक राजनैतिक संबंधांच्या आणि मानवतावादी संकटांच्या गुंतागुंतीसाठीही अत्यंत योग्य आहे. तिच्या लवचिक मोहिमांमुळे ती तीव्र युद्धापासून ते मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारणापर्यंत सर्व गोष्टींसाठी आदर्श ठरते. तारागिरी एका उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज असून ही युद्धनौका वाढत्या सागरी शक्तीचे प्रतीक आणि आपल्या निळ्या सीमांची एक अभेद्य संरक्षक आहे.
Comments are closed.