महाराष्ट्र, गुजरातला 270 मेगावॅट विजेचा तुटवडा; तारापूर अणुऊर्जा प्रकल्प दुरुस्तीसाठी दोन महिने बंद

अंतर्गत दुरुस्ती साठी तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील क्रमांक तीन हे २७० मेगावॅट क्षमतेचे युनिट दोन महिने बंद राहणार आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या युनिटमधील वीजनिर्मिती पुढील ६० दिवस पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. प्रकल्प तीन बंदमुळे महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यांना वीजपुरवठ्यात २७० मेगावॅट विजेचा तुटवडा भासणार आहे.
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील युनिट क्रमांक तीन आणि चार हे प्रत्येकी २७० मेगावॅट क्षमतेचे आहेत. या दोन्ही युनिटमधून मोठ्या प्रमाणावर अणुऊर्जेवर आधारित वीजनिर्मिती केली जाते. दर दोन वर्षांनी या युनिटपैकी एक युनिट तांत्रिक तपासणी आणि अंतर्गत दुरुस्तीसाठी बंद ठेवले जाते. यावर्षी युनिट क्रमांक तीनचे दुरुस्तीचे नियोजन करण्यात आले असून पुढील वर्षी युनिट क्रमांक चार दुरुस्तीसाठी बंद ठेवले जाणार आहे. अणुऊर्जा प्रकल्पातील दुरुस्तीचे काम प्रामुख्याने थंडीच्या दिवसांत हाती घेतले जाते. कारण या काळात विजेचा वापर तुलनेने कमी असतो. नुकताच पावसाळा संपल्याने आणि नोव्हेंबरपासून थंडीचा प्रारंभ होत असल्याने प्रकल्प व्यवस्थापनाने हा कालावधी दुरुस्तीसाठी निवडला आहे. या निर्णयामुळे काही काळ राज्यात विजेच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.
“४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून युनिट क्रमांक तीनमधील वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे. हे युनिट अंतर्गत दुरुस्ती आणि देखभाल कार्यासाठी बंद ठेवले जाणार असून सुमारे ६० दिवसांनी पुन्हा कार्यान्वित केले जाईल.”
अशोक शिंदे, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे मुख्य प्रबंधक.

Comments are closed.