हे तर होणारच होते… कसोटी पाचऐवजी चार दिवसांची करणे ही काळाची गरज

काळानुसार बदल हा प्रगतीचा नियमच आहे. जो काळानुसार स्वतःला बदलतो, घडवतो तोच या वेगवान जगात टिकतो. टी-20 च्या वेगवान जमान्यात क्रिकेटचे मूळ असलेल्या कसोटी क्रिकेटचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्याच्यातही बदल होणे अपेक्षित होते. गेल्या दशकभरातील कसोटी सामन्यांचा खेळ पाहता हे पाच दिवसांचे क्रिकेट चार दिवसांवर येणारच होते आणि आता ती अंमलबजावणी करण्याची मानसिक तयारी खुद्द आयसीसीनेही दाखवली आहे.
पाच दशकांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटचा जन्म झाल्यानंतर कसोटी क्रिकेटवरचे लोकांचे प्रेम काही प्रमाणात कमी झाले होते. लोकांचा ओढा जास्तीत जास्त एकदिवसीय क्रिकेटकडेच असायचा. मात्र कालांतराने कसोटीच क्रिकेटचा पाया असल्यामुळे त्याला मुख्य प्रवाहात ठेवण्याचा जोरदार प्रयत्न केला गेला. मात्र वेस्ट इंडीजसारखा बलाढय़ संघ रसातळाला पोहोचल्याने कसोटी क्रिकेटची खूप मोठी हानी झाली. कुणी मान्य करो अथवा न करो, वेस्ट इंडीजचा संघ मरणासन्न अवस्थेत पोहोचला आणि ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसमोर असलेले कसोटीतले आव्हानही आपोआप संपले. त्यानंतर कसोटी क्रिकेटची लोकप्रियताही ढासळत गेली.
त्यातच 2005 साली क्रिकेटच्या सर्वात छोटय़ा फॉरमॅटचा म्हणजेच टी-20 क्रिकेटचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. आधी या क्रिकेटला फारसे कुणी मनावर घेतले नव्हते. मात्र 2007 साली टी-20 चा पहिला वर्ल्ड कप खेळविला गेला आणि हा छोटय़ा क्रिकेटने मोठी क्रांती केली. मग बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीगचा श्रीगणेशा केला आणि क्रिकेटचे सारे विश्वच व्यापून टाकले. येथूनच क्रिकेट आणखी वेगवान झाले. वन डेच नव्हे, तर कसोटी क्रिकेटलाही टी-20 ची लागण झाली आणि नेहमीच अनिर्णितावस्थेत सुटणारे कसोटी सामने निकालात निघू लागले.
गेल्या दोन वर्षांत 80 पैकी 50 कसोटी समोर चार दिवसांतच संपले
कसोटी क्रिकेटची लोकप्रियता किती वाढली याबाबत निश्चित सांगता येत नाही. मात्र टी-20 क्रिकेटमुळे कसोटी अनिर्णित राहण्याचे प्रमाण घटले आहे. नुकत्याच संपलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या दोन वर्षांच्या हंगामात एकूण 70 कसोटी सामने खेळले गेले. त्यापैकी केवळ चारच सामने अनिर्णित राहिले. यावरून कसोटी अनिर्णितावस्थेत सुटण्याचा प्रकार हळूहळू खूप कमी झाला आहे. तसेच 70 पैकी केवळ 16 कसोटी सामन्यांचा निकाल पाचव्या दिवशी लागला. म्हणजेच उर्वरित 50 कसोटी सामने हे चार दिवसांच्या आतच संपलेत. विशेष म्हणजे 50 पैकी 20 कसोटी सामन्यांचा खेळ हा अवघ्या दोन आणि तीन दिवसांतच संपला होता. यावरूनच कसोटीचा खेळ हा चार दिवसांच्या पुढे जात नसल्याचे निदर्शनास आले आणि आयसीसीला कसोटी क्रिकेट चार दिवसांवर आणण्याची मानसिक तयारी करावी लागली आहे.
मुख्य संघाच्याही कसोटी चार दिवसांच्याच कराव्या लागणार
आयसीसीने छोटय़ा संघांना जास्तीत जास्त कसोटी सामने खेळता यावे म्हणून कसोटी चार दिवसांवर आणण्याचे ठरविले असले तरी ऑस्ट्रेलिया असो किंवा हिंदुस्थान नाहीतर इंग्लंड, या तिन्ही महत्त्वाच्या संघांच्या निम्म्या लढती तीन दिवसांच्या आत संपल्या आहेत आणि पुढेही संपतील. त्यामुळे आयसीसीने कसोटीतील प्रमुख संघांच्या लढती पाच दिवसांच्याच खेळविल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी टी-20 च्या झंझावातापुढे कसोटी क्रिकेटला जगविण्यासाठी हे मूळ क्रिकेटही पाच दिवसांऐवजी चार दिवसांचे करावे लागणार, हे निश्चित आहे. मात्र हा निर्णय घेण्यासाठी आयसीसीला आणखी किती काळ विचार करावा लागेल, याबाबत मात्र अनिश्चितता कायम राहील.
Comments are closed.