Thackeray criticizes Fadnavis over order for inquiry
देशात आणि महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक अशा दुर्घटनांची मालिका सुरू आहे. स्वतःला ‘विकास पुरुष’, ‘जनतेचे तारणहार’ वगैरे म्हणवून घेणाऱ्यांची हवा त्यामुळे निघाली आहे. दुर्घटना घडत आहेत. त्यात माणसांचे बळी जात आहेत हा सरकारचा नाकर्तेपणा आहे.
(Pune Bridge Collapsed) मुंबई : पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला. त्यात किमान 35-40 पर्यटक वाहून गेल्याचे वृत्त धक्कादायक आहे. पूल जुना होता. त्याच्यावर पर्यटकांनी गर्दी केली. भार जास्त झाल्याने तो कोसळला. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त करून हे कसे घडले याबाबत चौकशीचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांचे दुःख, चिंता, चौकशीचे आदेश हे एक ढोंग आहे. मगरीचे अश्रू आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (Thackeray criticizes Fadnavis over order for inquiry)
मुख्यमंत्र्यांचे खजिनदार गिरीश महाजन हे अशा दुर्घटनांची जणू वाटच पाहतात. दुर्घटना झाली की, लगेच ते मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना पाचेक लाखांची मदत जाहीर करतात. सरकारी हलगर्जीपणामुळे जे जीव जातात, त्या जिवांची किंमत गिरीश महाजन प्रत्येकी पाच लाख ठरवतात, पण जीव का जात आहेत? कोणामुळे जात आहेत? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून विचारला आहे.
इंद्रायणी नदीवरील पूल जुना झाला. तो नव्याने बांधण्यासाठी सरकारने आठ कोटी रुपये मंजूर केले. हे आठ कोटी कागदावरच राहिले. सर्व पैसा राजकीय लाभार्थी योजनांवर खर्च झाल्याने राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. परिणामी, इंद्रायणी नदीवरील पूल दुरुस्त झाला नाही आणि माणसे वाहून गेली. हा सदोष मनुष्यवधाचाच अपराध आहे, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
देशात आणि महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक अशा दुर्घटनांची मालिका सुरू आहे. स्वतःला ‘विकास पुरुष’, ‘जनतेचे तारणहार’ वगैरे म्हणवून घेणाऱ्यांची हवा त्यामुळे निघाली आहे. दुर्घटना घडत आहेत. त्यात माणसांचे बळी जात आहेत हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. महाराष्ट्रावर तर मोठीच आफत आली आहे, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
Comments are closed.