एखाद्या देशाची ओळख त्याच्या भाषेद्वारे निश्चित केली जाते!
देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना लवकरच लाज वाटेल : भाषेच्या वादात अमित शाह यांचे मोठे विधान
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
कोणत्याही देशाची ओळख ही तेथे बोलल्या जाणाऱ्या भाषेतूनच होत असते, असे वक्तव्य करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय भाषांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. भाषा आपल्या ओळखीचा अविभाज्य भाग असून त्याशिवाय आपल्याला भारतीय म्हणता येणार नाही. भारतातील लोकांना इंग्रजी बोलण्याची लाज वाटेल असा दिवस आता दूर नाही, असेही ते पुढे म्हणाले. भारतीय भाषांचे वर्णन करताना देशाच्या संस्कृतीची महतीही त्यांनी सांगितली.
दिल्लीमध्ये माजी आयएएस अधिकारी आशुतोष अग्निहोत्री यांनी लिहिलेल्या ‘मैं बूंद स्वयं, खुद सागर हूं’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना अमित शाह यांनी भाषेबाबत परखडपणे मत मांडले. “माझे लक्षपूर्वक ऐका आणि लक्षात ठेवा, या देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल, अशा समाजाची निर्मिती आता दूर नाही. जे एकदा मनात ठरवतात तेच काही करू शकतात. मला विश्वास आहे की आपल्या देशाच्या भाषा आपले रत्न आहेत. त्यांच्याशिवाय आपण भारतीय नाही. आपण कोणत्याही परदेशी भाषेत आपला इतिहास, संस्कृती आणि धर्म समजू शकत नाही”, असे शाह म्हणाले.
हिंदीसह ‘भारतीय भाषांचे भविष्य’ यावर शाह म्हणाले, ‘आपला देश, संस्कृती, इतिहास आणि धर्म समजून घेण्यासाठी कोणतीही परदेशी भाषा पुरेशी असू शकत नाही. अपूर्ण परदेशी भाषांद्वारे पूर्ण भारताची कल्पना करता येत नाही. ही लढाई भारतीय समाज जिंकेल. पुन्हा एकदा स्वाभिमानाने आपण आपला देश आपल्याच भाषांमध्ये चालवू आणि जगाचे नेतृत्वही करू’ असेही शाह यांनी अभिमानाने सांगितले.
2047 पर्यंत भारत जगात अव्वल
पंतप्रधान मोदींनी अमृत काळासाठी पंच प्राण उपक्रमाचा पाया रचला आहे. विकसित भारताचे ध्येय साध्य करणे, गुलामगिरीच्या प्रत्येक खुणा दूर करणे, आपल्या वारशाचा अभिमान बाळगणे, एकता आणि एकजुटीसाठी वचनबद्ध असणे आणि प्रत्येक नागरिकात कर्तव्याची भावना निर्माण करणे अशा पाच प्रतिज्ञा 130 कोटी लोकांचा संकल्प बनले आहेत. ही ध्येये गाठताना 2047 पर्यंत आपण अव्वल असू आणि आपल्या भाषा या प्रवासात प्रमुख भूमिका बजावतील, असेही ते पुढे म्हणाले.
Comments are closed.