… मग आम्ही परवाना रद्द करू!

एअर इंडियाला डीजीसीएचा इशारा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उड्डाण ऑपरेशन्समध्ये अनियमितता सुरू राहिली तर एअरलाइनचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो किंवा रद्दही केला जाऊ शकतो, असा गंभीर इशारा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडियाला दिला आहे.   पायलट ड्युटी शेड्युलिंग आणि मॉनिटरिंगमधील गंभीर चुकांमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी डीजीसीएच्या आदेशानुसार एअर इंडियाने 3 अधिकाऱ्यांना सेवेतून काढून टाकले होते. यामध्ये विभागीय उपाध्यक्ष चुडा सिंग, क्रू शेड्युलिंग विभागातील मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि क्रू शेड्युलिंग नियोजन पाहणाऱ्या पायल अरोरा यांचा समावेश आहे.

एव्हिएशन सेफ्टी प्रोटोकॉलचे गंभीर उल्लंघन केल्याबद्दल तीन अधिकाऱ्यांवर कारवाई केल्यानंतरही डीजीसीएने एअर इंडियावर कडक नजर कायम ठेवली आहे. 12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-171 टेकऑफ केल्यानंतर लगेचच अहमदाबादमध्ये कोसळले होते. या दुर्घटनेनंतर डीजीसीएने 2024 पासून एअर इंडियाने केलेल्या सर्व तपासणी आणि ऑडिटची माहिती मागितली आहे. डीजीसीएने फ्लाइट ऑपरेशन निरीक्षकांना 22 जूनपर्यंत एअर इंडियाची माहिती देण्यास सांगितले आहे. हा डेटा नियोजित-अनियोजित तपासणी, ऑडिट, कॉकपिट/एनरोट, स्टेशन सुविधा, रॅम्प आणि केबिन तपासणीसंबंधीचा असेल.

व्यापक ऑडिट होणार

डीजीसीएने देशाच्या संपूर्ण विमान वाहतूक व्यवस्थेची पूर्ण छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच एक विशेष ‘व्यापक ऑडिट’ केले जाईल. या अंतर्गत, फ्लाइट ऑपरेशन्स, देखभाल, परवाना, सुरक्षा व्यवस्थापन, प्रशिक्षण संस्था, एमआरओ (देखभाल, दुरुस्ती, ओव्हरहॉल), एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोलर) सारख्या संपूर्ण यंत्रणेची तपासणी केली जाईल, असे नागरी विमान वाहतूक महासंचालक फैज अहमद किडवाई यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशात म्हटले आहे. यंत्रणेतील कमकुवतपणा ओळखून त्या दूर करण्यासाठी आणि हवाई सुरक्षा संरचना जागतिक मानकांनुसार मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

भरपाई देण्यास सुरुवात

विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आणि अवलंबितांना अंतरिम भरपाई देण्यास सुरुवात झाली आहे. 20 जूनपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत आतापर्यंत तीन कुटुंबांना पैसे मिळाले आहेत. उर्वरित दाव्यांवर प्रक्रिया केली जात आहे. टाटा समूहाकडूनही मृतांच्या वारसांना मदत दिली जात असून त्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

Comments are closed.