पुढील वर्षभरात टोलनाके रद्द केले जातील : गडकरी
बॅरियरलेस सिस्टम लागू होणार : देशात सध्या 10 ठिकाणी पायलट प्रोजेक्ट सुरू
सुधारणा…
- सध्याची टोल टॅक्स सिस्टम पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक सिस्टममध्ये रुपांतरित होणार
- नवीन सिस्टम अंतर्गत वाहने टोल बूथवर रांगेत न थांबता टोलकर भरू शकणार
- नवीन नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रोग्राम ‘एनपीसीआय’द्वारे विकसित
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत टोल वसुलीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. महामार्गांवरील सध्याची टोल कलेक्शन सिस्टम पुढील एक वर्षात रद्द केली जाईल आणि त्याऐवजी पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक, बॅरियरलेस टोल सिस्टम आणली जाईल, असे ते म्हणाले. सध्या ही नवीन सिस्टम 10 ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून एका वर्षाच्या आत देशभरात ती लागू करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच देशभरात सध्या सुमारे 4,500 महामार्ग प्रकल्प सुरू असून त्यांचा एकूण खर्च अंदाजे 10 लाख कोटी रुपये असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पूर्वी वाहनांना रोख रक्कम किंवा कार्डने पैसे भरण्यासाठी टोल प्लाझावर थांबावे लागत असे. त्यानंतर ‘फास्टॅग’ लागू झाल्यामुळे टोल प्लाझावर वाहनांचा थांबण्याचा वेळ कमी झाला आहे. आता पुढचे पाऊल अडथळामुक्त, हाय-टेक टोल प्लाझा तयार करण्याच्या दिशेने पाऊल पडत असल्याचे गडकरी यांनी संसदेत स्पष्ट केले. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (एनईटीसी) प्रोग्राम विकसित केला आहे. हा संपूर्ण देशासाठी एकसमान आणि परस्पर जोडलेला इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्लॅटफॉर्म आहे. वेगवेगळ्या महामार्गांवरील वेगवेगळ्या सिस्टीमचा त्रास दूर करणे आणि एकाच तंत्रज्ञानाचा वापर करून टोल कलेक्शन सुलभ करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
…अशी असेल नवी टोलवसुली प्रक्रिया
टोलवसुलीशी संबंधित नव्या ‘एनईटीसी’ सिस्टीमचा गाभा फास्टॅगप्रमाणेच असून तो रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानासह एक टॅग आहे. याचा स्टिकर वाहनाच्या विंडक्रीनवर चिकटवला जातो. वाहन टोल लेनमधून जाताच सेन्सर हा टॅग वाचतो आणि वापरकर्त्याच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून किंवा वॉलेटमधून पैसे कापले जातात. या प्रणालीअंतर्गतच येत्या वर्षात वाहनधारकांना टोल प्लाझाचा सामना करावा लागणार नाही. केंद्र सरकार यासाठी एका खास प्रणालीवर काम करत आहे. ही प्रणाली लागू झाल्यानंतर, कोणत्याही वाहनाला टोल बूथवर पैसे भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही.
वाहनचालकांना फायदा !
पुढील एक वर्षात सध्याची टोलवसुली प्रणाली पूर्णपणे बदलली जाईल. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल भरला जाईल. याचा सर्वाधिक फायदा वाहनचालकांना होईल. ही नवीन प्रणाली प्रायोगिक तत्वावर 10 ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. पुढील एक वर्षात ती देशभरात विस्तारली जाईल.
– नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
Comments are closed.