पक्ष चोरला, मत चोरले आणि आता जमीनही चोरायला लागले; उद्धव ठाकरे कडाडले, ‘दगाबाज’ सरकारला जाब विचारा, शेतकऱ्यांना आवाहन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून आज चौथ्या दिवशी त्यांनी परभणीतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दगाबाज सरकारविरुद्ध लढण्याचे बळ दिले. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशी मागणी करत उद्धव ठाकरे यांनी मतचोरीनंतर जमीनचोरी करणाऱ्या सरकारवर आसूड ओढला. पक्ष चोरला, मत चोरले आणि आता हे जमीनही चोरायला लागले आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी सरकारच्या दगाबाज आणि बोगस कारभारचा जाब विचारण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.

उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरस्थिती, रखडलेली कर्जमुक्ती, पंचनामे यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरण्याऐवजी बिहारमध्ये प्रचारात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे अजित पवार म्हणतात सगळे फुकटच पाहिजे का? हातपाय हलवा. यांना हातपाय न हलवता जमीन मिळाली, पण मराठवाड्यात 100 वर्षात आली नाही अशी आपत्ती आली असून पंचनामे करून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी. आता नाही कर्जमुक्ती करायची तर कधी करायची? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. वेळेत पंचनामे झाले नाही आणि नुकसान भरपाई मिळाली नाही तर शेतकरी तहसीलदाराला घेराव घालतील आणि शेतकऱ्यांसोबत शिवसैनिकही रस्त्यावर उतरतील असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

आपला पक्ष चोरला, मत चोरले आणि आता जमीनही चोरायला लागले. कालच एक प्रकरण समोर आले. यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. पण प्रतिक्रिया देऊन काहीच होणार नाही. मुख्यमंत्री म्हणताता कुणाची गय केली जाणार नाहबी. पण चौकशी समिती नेमतील, क्लिन चीट देतील आणि संपला विषय. हे प्रकरण समोर येण्याआधी जैन मठाचे प्रकरण समोर आले होते. हा असा कारभार बघितल्यावर सरकारला मतचोरीशिवाय दुसरा पर्याय नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.

Comments are closed.