कोळी बांधवांना हुसकावण्याची भाषा करत असाल तर शिवसेना तो अन्याय तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत आणि आमदार सचिन अहिर यांनी शनिवारी शिवायल कार्यालयात ससून डॉकमधील कोळी बांधवांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ”कोळी बांधवांना हुसकावण्याची भाषा करत असाल तर शिवसेना तो अन्याय तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही”, अशा शब्दात महायुती सरकारला सुनावले आहे.
ससून डॉकमधील मासळी उद्योग संकटात सापडला आहे. डॉकमधील गोडाऊनमध्ये पिढ्यान्पिढ्या व्यवसाय करणारे मासळी व्यावसायिक अनेक वर्षे महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळाला (एमएफडीसी) भाडे देत आहेत. मात्र ते भाडे आपल्याला मिळालेच नाही, असा दावा करून मुंबई पोर्ट प्राधिकरणाने मासळी व्यावसायिकांना बाहेर काढण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. त्याबाबत आज ससून डॉकमधील कोळी बांधवांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
”आता शिवसेना तुमच्या सोबत आली आहे. तुमच्यासाठी आम्ही मैदानात उतरलोय. काही दिवसांनी बघू तर ज्यांच्यासाठी उतरलोय तेच गायब. असं होऊ देऊ नका. एकत्र रहा एकजुटीने रहा. शिवसेनाप्रमुख बोललेले की अन्यायावरती तुटून पडा, पण मी म्हणेन की अन्याय करणाऱ्याला अन्यायासकट तोडून टाका’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”कोरोनाचा काळ जागतिक संकटाचा होता. आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकलो नाही. जर आमचं सरकार आलं असतं तर तुमच्यावर लढण्याची वेळ आलीच नसती. बोललो की केलंच पाहिजे. आपलं सरकार आलं असतं तर तुमच्यावर लढण्याची वेळ आलीच नसती. शिवसेनेची स्थापनाच भूमीपुत्रांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी झाली आहे. महाराष्ट्राचा भूमीपुत्र मराठी आहे. आपण आपल्या पंरपरागत चाललेल्या गोष्टी करत इथे राहत आलेलो आहोत. पण हल्ली या परंपरागत गोष्टी नाहिशा होत चालल्या आहेत. तोच एक मुद्दा घेऊन सरकार महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघाले आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Comments are closed.