उल्हासनगर महापालिकेचे कॅन्टीन पाच वर्षांपासून बंद, दोन हजारांचे भाडे 25 हजार केले

पूर्वी असलेले दोन हजार रुपये भाडे हे तब्बल 25 हजार रुपये केल्यामुळे उल्हासनगर महापालिका मुख्यालयातील कॅन्टीन गेल्या पाच वर्षांपासून बंद पडले आहे. त्याचा मोठा फटका पालिकेत कामानिमित्त येणारे नागरिक, पालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांना बसत आहे. दरम्यान साधी चहा-नाश्त्याची सोय नसणारी उल्हासनगर ही एकमेव पालिका असल्याची टीका नागरिकांकडून होऊ लागली आहे.
महापालिकेच्या पहिल्या गेटच्या डाव्या बाजूला असलेल्या वाहन विभागाच्या अलीकडे मालमत्ता कर विभागाच्या भिंतीला लागून एक साधी पत्र्याच्या शेडमध्ये कॅन्टीन होती. विशेष म्हणजे भिंत नसलेली ही कॅन्टीन लाकडी जाळ्या, प्लास्टिकच्या आवरणात सुरू होती. गेली अनेक वर्षे जितू उपाध्याय नावाचे इसम ही कॅन्टीन दोन हजार रुपये भाडेतत्त्वावर चालवत होते. लाईट बिलदेखील जितू उपाध्याय हेच भरत होते. मात्र कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वी पालिकेने दोन हजार रुपये असलेले भाडे हे 25 हजार करण्याचा निर्णय घेतला. इतकी मोठी भाडेवाढ झाल्यामुळे जितू उपाध्यक्ष यांनी कॅन्टीन चालविणे बंद केले.
Comments are closed.