नात्यांच्या गुंत्यातील मनोव्यापार उलगडणाऱ्या ‘माया’चा टीझर प्रदर्शित – Tezzbuzz

नात्यांच्या गुंतागुंतीकडे हळुवारपणे पाहाणाऱ्या आणि माणसाच्या अंतर्मनातील हालचाली टिपणाऱ्या कथा दिग्दर्शक आदित्य इंगळे यांच्या चित्रपटांची खास ओळख आहे. ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’सारख्या चित्रपटांतून नात्यांवर संवेदनशील भाष्य करणाऱ्या आदित्य इंगळे यांचा ‘माया’ हा नवा चित्रपट आता त्याच भावविश्वाचा पुढचा टप्पा ठरत असल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून दिसून येतं. या टीझरमुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

टीझरमधून एक महत्त्वाचा विचार पुढे येतो. माणूस खरंतर एकटेपणाला घाबरत नाही, तर पोरकेपणाच्या भावनेला घाबरतो. ‘माया’चा टीझर हा भाव अतिशय हळुवारपणे उलगडतो. नात्यांमध्ये अडकलेलं मन, त्यातून तयार होणारे मनोव्यापार आणि आयुष्य प्रवाही होण्यासाठी आवश्यक असलेली भावनिक मुक्तता यावर हा चित्रपट भाष्य करत असल्याचं जाणवतं.

चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरने साकारलेली हाऊस फादरची भूमिका नात्यांकडे पाहाण्याचा वेगळा, समजूतदार दृष्टिकोन देते. मुक्ता बर्वे(Mukta Barve)विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या व्यक्तिरेखा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उभ्या असलेल्या माणसांच्या भावविश्वाचं प्रभावी प्रतिनिधित्व करतात. तर गिरीश ओक यांची व्यक्तिरेखा विशेष लक्ष वेधून घेते. आजाराने ग्रस्त असलेला, अंतर्मुख आणि काहीसा विचित्र स्वभाव असलेला हा माणूस मनात खोलवर साठवून ठेवलेल्या आघातांमुळे इतरांपासून दुरावलेला दिसतो. त्यांचा अस्वस्थपणा आणि मनातील अढी कथेला गंभीर आणि विचारप्रवर्तक वळण देताना दिसते.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ‘’बर्‍याच वेळा आपण मनाला गाठी मारून ठेवतो. आयुष्यात पूर्वी घडून गेलेल्या काही घटना आपल्यावर खोलवर आघात करतात आणि त्यालाच आपण संपूर्ण आयुष्य समजतो. त्या अनुभवांवर प्रतिक्रिया देण्यात किंवा मनात अढी धरून ठेवण्यात आपण खूप काळ घालवतो. काळाच्या ओघात ही अढी सुटली, तरच आयुष्य प्रवाही होऊ शकतं. ही अढी नात्यांमधून, जिव्हाळ्यातून सुटते आणि त्यानंतर आयुष्य पुन्हा एकदा पुढे सरकायला लागतं. ‘माया’ हा चित्रपट याच भावनिक प्रवासावर भाष्य करतो.”

शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘माया’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. टीझरमुळेच चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत असून, नात्यांच्या गुंत्यातून उमटणारी ही हळवी तरीही खोलवर जाणारी कथा प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करून जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

https://youtu.be/sDwuUtAwi24?si=SEVx9zIItGTbo6fp

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Battle of Galwan: ‘मातृभूमि’चे शब्द आठवण करून देतील अटल बिहारी वाजपेयींच्या प्रेरक कवितां आणि भाषणं

Comments are closed.