मोठी बातमी: अजित पवारांचा जिल्हाध्यक्ष म्हणतो, भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला

वसई-विरार महानगरपालिका निवडणूक 2026: वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपावर जोरदार (BJP vs Ajit Pawar NCP) हल्लाबोल केला आहे. “भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसलं आहे. जो मित्रांशी विश्वासघात करतो, तो मतदारांचाही विश्वासघात करू शकतो,” असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वसई-विरारमधील जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी केला आहे. तसेच अजित पवारांच्या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ठाम नारा दिला आहे. (Vasai-Virar Municipal Corporation Election 2026)

निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजपाकडून महायुतीचे आश्वासन देण्यात आले, मात्र प्रत्यक्षात एकही जागा देण्यात आली नाही. दिलेली आश्वासने पाळली गेली नसल्याने युती केवळ नावापुरती ठरल्याचा आरोप करण्यात आला. युतीचे गणित असताना आम्ही सर्व बैठकींना उपस्थित राहिलो, युती धर्म पाळला; मात्र भाजपने आमच्याशी दगाफटका केल्याचे पक्षाने स्पष्ट केले.

वसईतील राजकीय वातावरण तापले- (Vasai-Virar Municipal Corporation Election 2026)

आमच्या पक्षाची ताकद नसती तर भाजपाने आमचे उमेदवार फोडण्याचा प्रयत्न केला नसता. आमचे उमेदवार पळवले गेले, हेच आमच्या ताकदीचे द्योतक असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. कुणीतरी युती करत नाही म्हणून पक्ष थांबत नाही. त्यामुळे वसईत आम्ही स्वबळावर लढणार, अशी ठाम भूमिका अजित पवार गटाने मांडली आहे. या आक्रमक भूमिकेमुळे वसईतील राजकीय वातावरण अधिक तापले असून, आगामी निवडणुकीत थेट लढतीची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

वसई-विरारमध्ये महायुतीतून शिवसेना ठाकरे गट बाहेर-

वसईविरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आज आपल्या इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे उबाठा गटाने 'ऐकला चलो'ची भूमिका स्वीकारल्याचे स्पष्ट झाले असून, वसईविरारमध्ये महायुती तुटल्याची चिन्हे ठळकपणे दिसू लागली आहेत. आज जवळपास १०० जणांना एबी फॉर्म वाटपक केलं जाणार असल्याच कळतं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि मनसे यांच्यात संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू होती. मात्र सध्याच्या घडामोडींमुळे ही चर्चा आता धूसर झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, वसईविरारमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटपाची बोलणी पूर्ण झाली असून, दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. एकूणच वसईविरारच्या राजकारणात शिवसेना उबाठा गटाने वेगळी भूमिका घेतल्याने आता नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली असून, निवडणूक लढतीत तिरंगी-चौथ्या आघाड्यांची शक्यता अधिक गडद होताना दिसत आहे.

वसई‑विरार महानगरपालिकेमध्ये 29 प्रभाग- (Vasai-Virar Municipal Corporation Election 2026)

वसई‑विरार महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांची मुदत 28 जून 2020 रोजी संपली होती. त्यानंतर निवडणुका विविध कारणांनी पुढे ढकलल्या गेल्या आणि त्यामुळे निवडलेली नगरसेवक न बसता प्रशासक शासन लागू राहिलं होतं. सध्या वसई विरार महापालिकेत 29 प्रभाग असून, 115 सदस्य संख्या आहे. यापैकी 58 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर 57 जागा पुरुषांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती (एस.सी.) आणि अनुसूचीत जमाती (एस.टी.) साठी प्रत्येकी साठी 5 आरक्षण आहेत. तर यात प्रत्येकी 2 महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहेत. तसेच 74 जागा या सर्वसाधारण प्रवर्गाकरीता राखीव ठेवण्यात आल्या आहेत

वसई-विरार महानगरपालिका निवडणूक 2015 – पक्षनिहाय निकाल (Vasai-Virar Municipal Corporation Election 2026)

एकूण जागा – 115

बहुजन विकास आघाडी (BVA) – 106 जागा

भारतीय जनता पक्ष (भाजप) – 1 जागा

काँग्रेस (INC) – 0 जागा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) – 0 जागा

शिवसेना – 5 जागा

इतर / अपक्ष – 3 जागा

संबंधित बातमी:

Vasai-Virar Municipal Corporation BVA MNS Alliance मोठी बातमी: वसई-विरारमध्ये मनसे अन् बविआची युती; ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढणार, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.