'विश्वासाचा विजय, खोट्याचा पराभव'
दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विजय संबोधन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मिळविलेले प्रचंड यश हा जनतेच्या आमच्यावरच्या विश्वासाचा विजय आहे. जनतेने विरोधी पक्षांनी हेतुपुरस्सर परसविलेल्या असत्याचा दणदणीत पराभव केला आहे. या विजयामुळे आमच्यावरील उत्तरदायित्व वाढले असून आम्ही बिहारच्या विकासासाठी अधिक निर्धाराने प्रयत्न करणार आहोत,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
बिहारमधील शानदार विजयानंतर ते दिल्लीच्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात विजयोत्सव साजरा करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांसमोर भाषण करत होते. पवित्र गंगा नदी बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये वाहत जाते. त्यामुळे आता आमचे पुढचे लक्ष्य पश्चिम बंगाल हे आहे, अशी घोषणा त्यांनी केली. आम्ही बिहारमधील जंगलराज संपविले. आता पश्चिम बंगालमधील जंगलराज आम्हाला संपवायचे आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या घोषणेनंतर ‘बिहार तो एक झांकी है, पश्चिम बंगाल बाकी है’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
विजय जनतेला समर्पित
बिहारच्या जनतेने विरोधकांच्या अफवांना, बनावट आरोपांना आणि अस्थैर्य माजविण्याच्या प्रयत्नांना मूठमाती दिली आहे. त्यांनी आमच्या कार्यांवर, आमच्या योजनांवर, आमच्या परिश्रमांवर आणि आमच्या निर्धारावर विश्वास व्यक्त केला आहे. विरोधकांनी मतचोरीसारखे बिनबुडाचे आरोप करुन जनतेचे लक्ष विचलित करण्याचा कसून प्रयत्न केला. पण सूज्ञ मतदारांनी तो हाणून पाडला. बिहारच्या मतदारांनी या निवडणुकीत अनेक जुने विक्रम मोडीत काढले. अनेक नवे विक्रम केले. महिलांचा या निवडणुकीतील सहभाग अभूतपूर्व होता. जनतेने आम्हाला जे यश दिले आहे, ते लक्षात ठेवून आम्ही बिहारला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहोत. त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
नितीश कुमार यांची प्रशंसा
नितीश कुमार यांनी प्रयत्नपूर्वक बिहारमधील जंगलराज संपविले. या राज्यातील जनतेला सुरक्षा दिली. विकासाचे दरवाजे उघडले. त्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये घेतलेल्या कष्टांचा हा परिणाम आहे. आम्ही आता आमच्या या नव्या कार्यकाळात बिहारची ‘आन, बान आणि शान’ सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करु. विकासाठी नवनवी ध्येये गाठू, असा निर्धारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
काँग्रेसवर घणाघात
आजची काँग्रेस ही माओवादी काँग्रेस आहे. व्यवस्थेसंबंधी लोकांच्या मनात अविश्वास निर्माण करण्याचा तिचा प्रयत्न आहे. मतचोरीचा बनावट मुद्दा उपस्थित करुन काँग्रेसने निवडणुकीची दिशा भरकटविण्याचा प्रयत्न केला. तथापि, तो असफल ठरला. आम्ही बिहारमध्ये जी प्रगती केली, तीच जनतेने महत्वाची मानली. विरोधी पक्षांना हा मोठा धडा आहे, असा घणाघात त्यांनी काँग्रेसवर केला.
Comments are closed.