स्मशानभूमीच्या कामाचे बिल काढण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागितली, ग्रामविकास अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले

स्मशानभूमीच्या कामाचे बिल काढण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी रंगेहाथ पकडले. विजयकुमार पंडितराव क्षीरसागर (53) असे लाचखोर ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांकडूनच ही लाच स्वीकारली.
भायगाव (वैजापूर) येथे जन सुविधा अंतर्गत स्मशानभूमीचे काम झाले होते. या कामाचे 6 लाख 96 हजार रुपयांचे बिल मंजूर झाले होते. हे काम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाने केले होते. काम पूर्ण झाल्याची एनओसी उपसरपंच यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दाखल केली. बिलापैकी 94 हजार रुपये काढण्यासाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्याने 15 हजार रुपयांची मागणी केली. नावे चेकवर साइन करून देण्यासाठी ग्रामसेवकाने लाचेची मागणी केली. परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने उपसरपंचाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संगीता पाटील, हवालदार राजेंद्र सिनकर, विलास चव्हाण, सी.एन. बागूल यांच्या पथकाने सापळा रचला. उपसरपंचांनी आरोपी ग्रामपंचायत अधिकारी क्षीरसागर यांस मोबाईलवर संपर्क करून कुठे भेटायचे, असे विचारले. त्याने जरुळ फाट्यावरील चैतन्य हॉटेलवर बोलावून घेतले. तेथे पंचासमक्ष 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना क्षीरसागर यास रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातील मोबाईल, रोख 700 रुपये, कागदपत्रे जप्त केली. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Comments are closed.