आम्ही तोटा सहन करू, परंतु पाकिस्तानशी कोणताही व्यापार नाही.
भारतीय व्यावसायिकांचा संकल्प
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्यापारी आता पाकिस्तानसोबत व्यापार करण्यास तयार नाहीत. व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी)ने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे देशाच्या व्यापाऱ्यांनी पाकिस्तानसोबत कुठल्याही प्रकारचा व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली.
सीएआयटीकडुन भुवनेश्वरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हा निर्णय घेण्यात आला. पहलगाममध्ये निर्दोष पर्यटकांच्या हत्येच्या विरोधात व्यापारी समुदायाने पाकिस्तानसोबत सर्वप्रकारची आयात आणि निर्यात त्वरित बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघटनेचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले आहे. संघटनेनुसार 2018 मध्ये 3 अब्ज डॉलर्सचा दोन्ही देशांदरम्यान व्यापार झाला होता, तर 2024 मध्ये व्यापाराचे प्रमाण जवळपास 1.2 अब्ज डॉलर्सपर्यंत कमी झाले होते.
नुकसान सहन करू
एप्रिल 2024 पासून जानेवारी 2025 दरम्यान भारताने पाकिस्तानला सुमारे 500 दशलक्ष डॉलर्सच्या सामग्रीची निर्यात केली, यात मुख्यत्वे औषधे, केमिकल्स, साखर आणि ऑटो पार्ट्स सामील होते. तर आयात केवळ 0.42 दशलक्ष डॉलर्सची राहिली. आता व्यापाऱ्यांनी पाकिस्तानसोबतचा व्यापार पूर्णपणे समाप्त करण्याचा संकल्प केला आहे. भारताचा व्यापारी समुदाय राष्ट्राची एकता, सार्वभौमत्व कायम राखण्यासाठी कुठल्याही प्रकारचे आर्थिक नुकसान किंवा खर्च सहन करण्यास तयार असल्याचे खंडेलवाल यांनी म्हटले आहे.
Comments are closed.