Weather update in Maharashtra mumbai kokan and state
मुंबई : भारतीय हवामान खात्याने कोकण विभाग खासकरून मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. पुढील 4 दिवसांमध्ये या भागांत वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर, ठाणे, पालघर परिसरातसुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईला पुढील 48 तासांसाठी अलर्ट जारी केला आहे. बुधवारी (25 जून) आकाश पूर्णपणे ढगाळ राहणार असून मुंबईत सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तविली आहे. (weather update in Maharashtra mumbai kokan and state)
हेही वाचा : EC Vs Rahul Gandhi : निवडणुका नियमानेच होतात, शंका असेल तर येऊन भेटा…आयोगाचे राहुल गांधींना आमंत्रण
मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. तरी ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर, रायगड आणि तळकोकणात जोरदार पावसाचा कहर सुरूच आहे. घाटमाथ्यावर सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तलाव भरू लागले आहेत. काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच झालेल्या मुसळधार पावसासोबत धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे महापुराचा धोका निर्माण झाला आहे. पुढील 24 तास हे 4 जिल्ह्यांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण गुजरात आणि पश्चिम महाराष्ट्रातही पुढील काही दिवस जोरदार पाऊस बरसणार आहे. पालघर, वलसाड, नवसारी, सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद या भागांमध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे परिसरातील घाटमाथा आणि दक्षिण कोकणातदेखील पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
सध्या पुणे, सातारा, कोल्हापूर या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. घाटमाथ्यांवर काही ठिकाणी 100 ते 150 मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. येत्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर थोडाफार वाढण्याची शक्यता असून, कृषी आणि पाण्याच्या साठ्यांसाठी हे उपयुक्त ठरणार आहे. तसेच, औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाचा जोर अपेक्षेप्रमाणे नाही. काही भागांत किरकोळ 15 ते 30 मिमी इतकाच पाऊस पडला आहे. शेतकरी वर्गाला पेरणीसाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच, विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही भागांत एका दिवसात 70 ते 120 मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली आहे.
Comments are closed.