Weather update in Thane Mumbai and maharashtra IMD alerts


मुंबई : मुंबईसह राज्यभरात मे महिन्यामध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्यानंतर जून महिन्यातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, अनेकठिकाणी पावसाने दडी मारल्याचे दिसून आले.त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली असून नेमका पाऊस कधी पडणार? याकडे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच, ठाणे आणि मुंबईसारख्या शहरातही पावसाचा जोर मंदावलेला पाहायला मिळाला. अशामध्ये हवामान खात्याने मंगळवारी (10 जून) ठाणे, मुंबईसह नवी मुंबई, पालघर आणि संपूर्ण कोकण परिसरात ढगाळ वातावरण राहणार आहे. काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा रिमझिम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (weather update in Thane Mumbai and maharashtra IMD alerts)

हेही वाचा : Bhushan Gagrani : रस्त्याची चाळण झाल्यास संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई; आयुक्तांचा इशारा 

जून महिना म्हटला की पावसाळ्याची सुरुवात होते, पण यंदा मात्र जूनमध्ये मान्सून अद्याप स्थिरावलेला नाही. काही भागांत हलक्या सरी तर काही भागांत प्रखर ऊन, अशा तऱ्हेने हवामान सतत बदलत आहे. कोकण किनारपट्टीवरील शहरांमध्येही अजूनही उन्हाचा तडाखा जाणवत आहे. मंगळवारी (10 जून) मुंबईत प्रामुख्याने ढगाळ हवामान राहणार आहे. सकाळी सौम्य उष्णता आणि ओलावा जाणवेल. मुंबईत कमाल तापमान 32 अंश सेल्सियस तर किमान तापमान हे 28 अंश सेल्सियस असणार आहे. दुपारनंतर काही भागांत रिमझिम सरींची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे शहरात ओलावा वाढेल, ज्याचा थोडाफार परिणाम वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर होऊ शकतो. समुद्रकिनाऱ्यांजवळ अधिक आर्द्रता जाणवेल, त्यामुळे अस्वस्थतेचा अनुभव येऊ शकतो.

तसेच, पालघर परिसरातही मंगळवारी सकाळी हलक्या सरींची शक्यता आहे. यावेळी इथे कमाल तापमान हे 35 अंश सेल्सियस आणि किमान तापमान हे 27 अंश सेल्सियस असणार आहे. दुपारी उष्णतेची तीव्रता अधिक जाणवेल. तर, दुपारनंतर दमट हवामानामुळे घामाचे प्रमाण वाढू शकते. नवी मुंबईत आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. उष्णता आणि ओलाव्याचे प्रमाण अधिक राहील. दुपारनंतर काही भागांत रिमझिम सरींची शक्यता आहे. तर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हवामान तुलनात्मकदृष्ट्या सौम्य राहणार आहे. याठिकाणी काही भागांत रिमझिम किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर तसेच नाशिक परिसरात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस राहील असा अंदाज वर्तवला आहे. 10 जूनपासून हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होण्याचा अंदाज असून 13 जूनला मुसळधार पावसासह वाऱ्याचा वेग 50 ते 60 किमी प्रतितास पोहोचू शकतो. घाटमाथ्यांवर पावसाचा जोर अधिक असल्यामुळे प्रवाशांनी काळजी घ्यावी. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यांतही 11 ते 13 जून दरम्यान वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. 13 जून रोजी काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा असून वाऱ्याचा वेग 50 किमी प्रतितासापर्यंत जाऊ शकतो. शेतकऱ्यांनी आपल्या पीक आणि साठवलेल्या मालाची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.



Source link

Comments are closed.