रोहित शर्मा-विराट कोहलीचं पर्व संपलंय, यात गैर काय? गंभीरची पाठराखण करत अश्विनने मांडलं स्पष्ट मत

रोहित शर्मा आणि विराट कोहली आता भारतीय संघासाठी फक्त एकदिवसीय (ODI) फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहेत. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपनंतर दोघांनीही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर मे महिन्यात अचानक दोघांनी कसोटी (Test) क्रिकेटलाही अलविदा केले. या दोघांची कसोटी निवृत्ती चाहत्यांसाठी खरोखरच धक्कादायक होती. आता भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विनने गौतम गंभीरचे समर्थन करताना म्हटले आहे की, जर रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा काळ संपला असेल, तर त्यात चुकीचे काय आहे?

​’नवभारत टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार अश्विनच्या हवाल्याने म्हटले आहे की, गौतम गंभीरचा प्रशिक्षक म्हणून एक वेगळा दृष्टिकोन असू शकतो. त्यांना संघाच्या हितासाठी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. याशिवाय अश्विन म्हणाला की, जर गंभीरला असे वाटले की विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांची वेळ आता संपली आहे, तर त्यात गैर काय?

​स्वतःच्या निवृत्तीबद्दल बोलताना अश्विन म्हणाला, “जर कोणाला गौतम गंभीरवर रागावयचे असेल, तर तो मी असायला हवा, कारण ते प्रशिक्षक बनताच माझा काळ संपला होता. पण आपल्याला आपला अहंकार बाजूला ठेवून विचार करावा लागेल. प्रशिक्षकाचे काम संघाचे भविष्य सुरक्षित करणे हे असते. कदाचित त्यांच्या दृष्टीने माझं काही भविष्य नसेल आणि ते पूर्णपणे ठीक आहे.”

​अश्विन पुढे म्हणाला, “योग्य वेळी निर्णय घेणे ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. पर्थ कसोटीनंतर जेव्हा मी प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडलो, तेव्हा मला समजले होते की आता माझी वेळ संपली आहे. मी अशा खेळाडूंपैकी नाही जो पुनरागमनाच्या आशेने संघाच्या अवतीभवती घुटमळत राहील. मी माझ्या कारकिर्दीत बरेच काही साध्य केले आहे आणि आता नवीन लोकांसाठी जागा सोडणेच योग्य होते.”

Comments are closed.